मुंबई : कल्याण पूर्वेतील एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत आणि कठोर कारवाईची घोषणा केली आहे. प्रख्यात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याची बाजू मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित मुलगी मला माझ्या मुलगीसारखीच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना 4 महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शनिवारी पीडितेच्या पालकांसह मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि न्याय मिळावा अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं.
पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. ते म्हणाले की, कुटुंबानं घाबरण्याची गरज नाही. त्यांना कोणी त्रास दिल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगार यापुढे तुरुंगातून बाहेर येणार नाहीत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल याचीही खात्री त्यांनी दिली. या बैठकीनंतर अमरजीत मिश्रा म्हणाले, 'ही बाब केवळ एका कुटुंबाची नाही, तर मुलींच्या सुरक्षिततेची आणि न्यायाची आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी वकिलाची मुख्यमंत्र्यांनी केलेली नियुक्ती आणि ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश हे न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय, अमरजीत मिश्रा यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश दिला. विजय उपाध्याय, आयपी मिश्रा, सीपी मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते.