सोलापूर: बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मास्टमाईंड अजूनही पोलिसांना सापडला नाहीत. अशा परिस्थितीत माढा तालुक्यातील शेतकऱ्यानं राज्यात खळबळ उडवून देणारी घोषणा केली आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे एन्काउन्टर करणाऱ्याला शेतकऱ्यानं 51 लाख आणि 5 एकर देण्याचं जाहीर केलं. कल्याण बाबर (वय 45 रा वडशिंगे,ता माढा,जि. सोलापूर) असे ऑफर करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातदेखील चर्चा झाली. मात्र, आजतागायत कठोर कारवाई झाली नसल्यानं नाराज झालेल्या शेतकऱ्यानं थेट आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्यांना बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी बक्षिसाची माहिती प्रतिज्ञापत्रावर लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे.
एन्काऊंटर किंवा फाशीच्या शिक्षेपर्यंत आरोपींना पोहोचवा अन् बक्षीस घेऊन जा-
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल, त्या तपास अधिकाऱ्याला दोन लाख रुपये अथवा एन्काऊंटर करेल त्या पोलिस अधिकाऱ्यांना 51 लाख रुपये आणि पाच एकर जमीन बक्षीस कल्याण बाबर हे देणार आहेत.
- कशामुळे जाहीर केले बक्षीस?शेतकरी कल्याण बाबर यांनी गुन्हेगारांविरोधात संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, " गुन्हा हा गुन्हाच असतो. तो सत्ताधाऱ्यांचा असो की विरोधकांचा असला तरी कारवाई व्हावी. गुन्हेगारांची दहशत संपली पाहिजे. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे".
संतोष देशमुख प्रकरणात विरोधकांचे काय आहेत आरोप?बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हत्येतील मुख्य सूत्रधार अजून बाहेर असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर संशय व्यक्त केला जात आहे. तसे आरोपसुद्धा विधानसभेत झाले आहेत. वाल्मिक कहऱ्हाड याला अटक करण्यासाठी विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडबाबत काय म्हटले? " कोणत्याही पक्षाशी निगडीत असला किंवा कोणाबरोबरही वाल्मिक कराडचे संबंध असले तरी त्याच्यावर कारवाई होणार आहे. एका प्रकरणात त्याचा सहभाग दिसला आहे. दुसऱ्या प्रकरणात तपास सुरू आहे. त्याचा सहभाग आढळला तर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होईल, " असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानसभेत सांगितले.