पुणे : क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर बलास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या आयुष्याबाबत बोलताना सांगितलं की, "आयुष्यात शॉर्टकट घेणं चुकीचं असून, यश मिळालं नाही तर, अपयश पचव, पण त्यासाठी शॉर्टकट घेऊ नकोस, असा धडा मला घरातूनच मिळाला होता. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मी खूपच मस्ती करायचो. झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो. त्यामुळं माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडं घेऊन गेला आणि तेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरूवात केली."
आयुष्यात कुटुंबाला खूप महत्व : एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सचिन तेंडूलकरनं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाला की, "आयुष्यात कुटुंब या घटकाला खुप महत्व आहे. आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यासोबत तुमचं कुटुंबच असतं. क्रिकेट खेळत असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती."
पुणे कायमच माझ्यासाठी विशेष : "शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मी खूपच मस्ती करायचो. त्यामुळं मला सर्वजण मस्तीखोर म्हणायचे. सुट्टीच्या दिवसात मी, झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो. त्यामुळं, माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडं घेऊन गेला आणि माझं क्रिकेट सुरु झालं. तसंच माझी बहीण लग्नानंतर पुण्यात राहायला आली त्यामुळं मी, पण कुठेतरी थोडासा पुणेकर आहे," असं सचिन म्हणाला. "मुंबईसाठी जुनिअर लेव्हलला खेळायची सुरुवात १९८५ साली पुण्यात झाली. त्यामुळं पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे" अशी भावना सचिननं व्यक्त केली.
आयुष्यात शॉर्टकट न घेता काम करणं महत्वाचं : "१९८३ साली भारतानं क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यामुळं, आपण एकदा तो उचलायला हवा अशी भावना सहा वर्षांचा असतानाच माझ्या मनात आली होती. माझे कोच आचरेकर सर माझ्याकडून कसून सराव करून घ्यायचे. सरावानंतर स्टम्पवर एका रुपयांचं नाणं ठेवायचे आणि म्हणायचे की, तू १० मिनिटं आउट व्हायचं नाहीस. शिवाजी पार्कच्या मैदानात कुणीही तुझा झेल घेतला की, तू आउट असा नियम आचरेकर सरांनी मला घालून दिला. त्यामुळं मला १० मिनिटे आऊट न होता खेळावेच लागायचं. फलंदाजी करताना चेंडू हवेत मारता येत नव्हता. सरांच्या या शिकवणीतून आयुष्यात शॉर्टकट न घेता मानसिकदृष्टया सक्षम होण्याचा गुण अवगत झाला," अशी आठवण सचिननं यावेळी सांगितली.
आयुष्यात दबाव असणं आवश्यक : आजकाल अपेक्षांचं ओझं खूप असतं, त्यामुळं प्रेशर येतं असं आपण ऐकतो. तुझ्यावर १०० कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं असायचं ते तू कसं हाताळलं? असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला की, "आपल्यावर दबाव असणं आवश्यक आहे, तसं असंल तर काम चांगलं होतं. २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळत असताना संघाच्या बैठका व्हायच्या. त्यामध्ये अपेक्षा व्यक्त व्हायच्या. आपण विश्वचषक जिंकायला हवा, अशी प्रत्येकाची भावना असायची. आपल्याला हा कप जिंकायचा आहे, पण त्याचा दबाव घेऊ नका, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. पण, सकारात्मकतेबरोबरच प्रत्येकजण दबावात होता. त्यामुळं विश्वचषक जिंकू शकलो, त्यामुळं आयुष्यात दबाव असणं आवश्यक आहे" असx सचिननं सांगितलं.
तिथं प्रतिक्रिया देण्याची काय गरज होती? : चूक केली तर, आपला कान धरणारी व्यक्ती हवी? या प्रश्नाचं उत्तर देताना सचिननं सांगितलं की, "बंगळुरूमध्ये ऑस्ट्रलियाबरोबरच्या सामन्यात आपण केलेली चूक आणि त्याबदल्यात अजितनं धरलेला कान हा प्रसंग आठवतो. मी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण दोघेजण फलंदाजी करत होतो, माझ्या ३५ धावा झाल्या होत्या. मैदानावर प्रेक्षकांचा गलका सुरु होता आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मी रन आउट झालो. तेव्हा मी मैदानावर नाराजीची प्रतिक्रिया दिली आणि तंबूत परतलो. मॅच झाल्यावर घरी परतलो. तेव्हा अजित मला म्हणाला, तू बाद झाल्यावर तिथं प्रतिक्रिया देण्याची काय गरज होती? त्यामुळं व्ही. व्ही. एस. लक्ष्मण विचलित झाला असेल. त्याला तर पुढे फलंदाजी करायची होती, असं म्हणत त्यानं माझी अशी प्रतिक्रिया चुकीची होती हे दाखवून दिलं".
...तर मी क्रिकेटपटू नसतो : "अजित मला आचरेकर सरांकडं घेऊन गेला नसता तर, मी क्रिकेटपटू म्हणून घडलो नसतो. अनेक खेळाडू माझ्यासाठी धावले नसते तर, माझ्या इतक्या धावा झाल्या नसत्या. कुटुंब, मित्र, ग्राउंडमन असे अनेकजण माझ्यासाठी नेहमीच तयार असायचे. आवड असली की त्याला सीमारेषा नसतात," असेही तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
हेही वाचा :