कोल्हापूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बोलताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडं सर्वाधिक 7 लाख 38 हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत असल्याची माहिती दिली होती, यावर बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांचा दावा खोडून काढत सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी हे पंजाबमध्ये असल्याचा दावा केला. कोल्हापुरात मंत्री पाटील माध्यमांशी बोलत होते.
म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज कोल्हापूरला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "माझं शिक्षण कोल्हापुरात झाल्यानं माझं आणि कोल्हापूरचं नातं वेगळं आहे. कोल्हापुरातली सहकार चळवळ मी जवळून पाहिली आहे. त्यामुळंच गावाकडं गेल्यावर मी सहकारी संस्थां, बँका आपल्या भागात सुरू केल्या, त्याचाच अनुभव म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकार खात्याची जबाबदारी माझ्याकडं दिली.
सहकार चळवळीचं क्रेंद्र म्हणून जगात महाराष्ट्राची ओळख : "देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांचंही नेतृत्व सहकारी चळवळीतून तयार झालं आहे. ते गुजरातमधील जिल्हा बँकेचे चेअरमन होते. महाराष्ट्राची देशात नव्हे तर, जगात सहकार चळवळीचं केंद्र म्हणून ओळख आहे. रोजगार निर्मितीत सहकार आघाडीवर आहे, याचं श्रेय सहकार महर्षी विठ्ठलराव विखे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण शंकरराव मेथे यांना जातं. प्रत्येक घटक सहकार चळवळीशी जोडला गेला पाहिजे. दूध संस्था, सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था अडचणीत असताना त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे." अस सहकार मंत्री पाटील यावेळी म्हणाले.
कोणत्याही संस्थेला मुदतवाढ नाही : राज्यातील सहकारी संस्थांच्या आता जेवढ्या निवडणुका लागल्या आहेत. त्याबद्दल सरकारनं ठरवल आहे की, कोणत्याही सहकारी संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही. राज्यातील सहकारी कारखाने, सहकारी बँक सोसायटी यांना डेडलाईन दिली आहे. महायुती सरकार सत्तेवर येण्याआधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली होती. यावर बोलताना सहकार मंत्री पाटील यांनी "राज्यातील महायुती सरकार या निर्णयाबाबत सकारात्मक आहे. लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधावर अनुदान मिळेल" अस सांगितलं.
प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकरच : सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये कर्ज जास्त दिलं जातं, शेतकऱ्यांना ओटीएसबाबत परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर, लातूर, पुणे, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सहकार खात्याकडे पैसे आहेत प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 टक्के अनुदान देणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
मुश्रीफ निवडून येतील असं वाटलं नव्हतं : कोल्हापुरातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ निवडून येतील असं वाटलं नव्हतं. या मतदारसंघाचा विचार केला तर, या ठिकाणी मराठा मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुश्रीफांना याचा फटका बसेल असं वाटलं होतं. मात्र, सर्वसामान्यांसोबत त्यांनी मतदारसंघाचा केलेला विकास यामुळे ते सहाव्यांदा कागलमधून निवडून आले."
हेही वाचा :