नागपूर: हिवाळी अधिवेशन आजपासून 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे. फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडले जाण्याची शक्यता आहे. संख्याबळाअभावी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळविणं कठीण आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे.
Live Updates
- राजकारण केले तर राजकीय उत्तर मिळणार आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ते विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते.
- विधानपरिषदेचे कामकाज संपले आहे. उद्या दुपारी 12 वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू होणार आहे.
- सभापती नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात शोक प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा तसेच माजी विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनावर सभापती नीलिमा गोऱ्हे यांनी सर्वांचावतीने आदरांजली वाहिली. तसेच शोक प्रस्ताव पारित करुन सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंचाच्या हत्या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नसल्याची सभागृहाला ग्वाही दिली.
- विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे.
- राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील हे योग्यवेळी निर्णय घेतील, असा दावा केला. त्यांच्यासाठी मंत्रिपद राखीव ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं.
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 'ईव्हीएम हटाव'ची घोषणाबाजी केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय असेल कामकाज?
- विधानसभेच्या अधिवेशनात उर्वरित आर्थिक वर्षासाठी (मार्चपर्यंत) आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त खर्चावर, सत्ताधारी- विरोधी पक्षांच्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी 'पुरवणी मागणी' यावर चर्चा होणार आहे.
- राज्य सरकार विधानसभेत 6 पूर्णपणे नवीन विधेयके सादर करणार आहे. तर 14 अध्यादेश विधानसभेसमोर मांडले जाणार आहेत.
- महायुती आघाडीतील 39 नेत्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. येत्या दोन दिवसांत मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
52 वर्षात प्रथमच विरोक्षी पक्षनेतेपद नाही- गेल्या 52 वर्षात (1972 ते 2024) प्रथमच महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड होण्यासाठी विरोधी पक्षांकडं पुरेस संख्याबळ नाही. राज्य विधिमंडळ कायद्यानुसार विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या (288) 10 टक्के म्हणजे 29 एवढं संख्याबळ हवे असते. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) या तीनही पक्षांकडे प्रत्येकी आमदारांची संख्या 29 हून कमी आहे.
काय आहे विधानसभेचा नियम?: महाराष्ट्र विधानसभेचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा असो वा राज्य विधानसभा, विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी त्या पक्षाला 10% मिळणे आवश्यक आहे. त्याचा अर्थ 288 जागांपैकी 29 जागा मिळवणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, सर्वात मोठा विरोधी पक्ष - शिवसेनेकडं (UBT) फक्त 20 सदस्य आहेत. काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (एसपी) 10 आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याची परिस्थिती यापूर्वीदेखील विरोधी पक्षांवर ओढवली आहे.
संख्याबळ नसताना यापूर्वी देण्यात आले होते विरोधी पक्षनेतेपद
- कृष्णराव धुळप यांनी 1962 ते 1972 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. 1962, 1967 आणि 1972 या तीन टर्ममध्ये कोणत्याही एका पक्षाकडे 10 टक्के सदस्य असण्याचा पात्रता निकष नव्हता. 1962 मध्ये काँग्रेसनं 264 पैकी 215 जागा जिंकल्या होत्या. शेतकरी आणि कामगार पक्ष 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. शेतकरी कामगार पक्षाकडे 10 टक्के सदस्य नसतानाही कृष्णराव धुळप यांनी 1962 आणि 1967 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.
- 1972 मध्ये काँग्रेसने 222 जागा जिंकल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या पीडब्ल्यूपीने 7 जागा जिंकल्या होत्या. असे असले तरी 1972 मध्ये दिनकर पाटील विरोधी पक्षनेते होते.
- 1977 मध्ये शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले.
विरोधी पक्षनेते | कार्यकाळ | पक्ष | |
उत्तमराव पाटील | 28 मार्च 1978 | 17 जुलै 1978 | जनता पक्ष |
प्रभा राव | फेब्रुवारी 1979 | 13 जुलै 1979 | काँग्रेस |
प्रतिभा पाटील | 16 जुलै 1979 | फेब्रुवारी 1980 | काँग्रेस |
शरद पवार | 3 जुलै 1980 | 1 ऑगस्ट 1981 | भारतीय काँग्रेस (समाजवादी) |
बबनराव ढाकणे | 17 डिसेंबर 1981 | 24 डिसेंबर 1092 | जनता पक्ष |
दिनकर पाटील | 4 जुलै 1972 | जुलै 1977 | शेतकरी आणि कामगार पक्ष |
शरद पवार | 15 डिसेंबर 1983 | 14 डिसेंबर 1986 | भारतीय काँग्रेस (समाजवादी) |
निहाल अहमद | 14 डिसेंबर 1986 | 26 नोव्हेंबर 1987 | जनता पक्ष |
दत्ता नारायण पाटील | 27 नोव्हेंबर 1987 | 22 डिसेंबर 1988 | शेतकरी आणि कामगार पक्ष |
मृणाल गोरे | 23 डिसेंबर 1988 | 19 ऑक्टोबर 1989 | जनता पक्ष |
दत्ता नारायण पाटील | 20 ऑक्टोबर 1989 | 3 मार्च 1990 | शेतकरी आणि कामगार पक्ष |
मनोहर जोशी | 22 मार्च 1990 | 12 डिसेंबर 1991 | शिवसेना |
गोपीनाथ मुंडे | 12 डिसेंबर 1991 | 14 मार्च 1995 | भाजपा |
मधुकर पिचड | 25 मार्च 1995 | 15 जुलै 1999 | काँग्रेस |
नारायण राणे | 22 ऑक्टोबर 1999 | 12 जुलै 2005 | शिवसेना |
रामदास कदम | 1 ऑक्टोबर 2005 | 3 नोव्हेंबर 2009 | शिवसेना |
एकनाथ खडसे | 11 नोव्हेंबर 2009 | 8 नोव्हेंबर 2014 | भाजपा |
एकनाथ शिंदे | 12 नोव्हेंबर 2014 | 5 डिसेंबर 2014 | शिवसेना |
राधाकृष्ण विखे पाटील | 23 डिसेंबर 2014 | 5 जून 2019 | काँग्रेस |
विजय वडेट्टीवार | 24 जून 2019 | 9 नोव्हेंबर 2019 | काँग्रेस |
देवेंद्र फडणवीस | 1 डिसेंबर 2019 | 29 जून 2022 | भाजपा |
अजित पवार | 4 जुलै 2022 | 2 जुलै 2023 | राष्ट्रवादी |
विजय वडेट्टीवार | 3 ऑगस्ट 2023 | 26 नोव्हेंबर 2024 | काँग्रेस |
हेही वाचा-