मुंबई Devendra Fadnavis : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचं आज (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण कोस्टल रोडच्या इतिहासाची माहिती सांगत तत्कालीन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर निशाणा साधला आहे. यात कोणी खोडा घातला? कोणी कमिशन खाल्ले? कोणी वसुली केली? म्हणून सत्य हे सांगावचं लागतं. नाहीतर खोटं लोकांना खरं वाटू लागतं. म्हणून आज मी हे सत्य सांगितलं, असं ते म्हणालं. मुंबईत या कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
उद्यान व्यतिरिक्त एकही बांधकाम नाही : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कोस्टल रोडची एक लेन आज आपण सुरू केली आहे. लवकरच दुसरी लेन सुरू केली जाईल. आता एक लेन जरी सुरू करत असलो तरीसुद्धा यामुळे मुंबईकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता एक लेनचं काम पूर्ण झालं आहे आणि दुसऱ्या लेनचं काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल."
दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, उबाठा गटाचे आदित्य ठाकरे म्हणतात की, हे सर्व काम आम्ही केलं आणि याचं श्रेय महायुती घेत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही दुसऱ्याच्या कामाची श्रेयं घेणारे लोक नाही. आम्ही जी कामं करतो त्याचं श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना ही नवीन नसून वर्षांपासूनची होती. उद्धव ठाकरे यांनी तर कोस्टल रोडच्या प्रेझेंटेशनवर (Coastal Road Presentation) मागच्या दोन निवडणुका लढल्या; परंतु कोस्टल रोड कधी झालाच नाही. कोस्टल रोड बांधण्याची सर्वांत मोठी समस्या म्हणजे नियमांमध्ये सी लिंक बांधण्याला परवानगी आहे; परंतु कोस्टल रोड बांधायला परवानगी नव्हती. कारण कोस्टल रोड बांधण्याकरता रिक्लेमेशन करावं लागतं आणि रिक्लेमेशन केलं तर सीआरझेडची लाईन बदलेल. म्हणून रिक्लेमेशन करू देणार नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका होती.
सत्ताबदल झाला आणि रस्ता पूर्ण झाला : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "काही लोक कोस्टल रोड बाबत उच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात गेले. पण तिथेही आम्ही जिंकलो आणि आता याबाबत काही लोक दावा करत आहेत की, हे काम आमच्या काळात झालं. सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी याबाबत चांगल्या प्रकारे पाठपुरावा करत यातील बऱ्याच अडचणी दूर केल्या. मी विरोधी पक्ष नेता असताना माझ्याकडे अनेक लोक यायचे आणि ते सांगायचे की, आम्ही कसं काम करायचं? आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही. कारण इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वसुली सुरू आहे. अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर दबाव होता. अशा परिस्थितीत त्यांनी कामं कशी करायची? पण हा रस्ता पूर्ण झाला. कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. नाहीतर अजून दोन-पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता."
कोत्या मनाचे लोक काय असतात? फडणवीस पुढे म्हणाले, "जेव्हा कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं तेव्हा मी मुख्यमंत्री असतानासुद्धा मला भूमिपूजनाला बोलावलं नाही. मी भूमिपूजन रोखू शकलो असतो. प्रकल्प दुसऱ्यांना देऊ शकलो; परंतु मी तसं केलं नाही. कारण आम्हाला श्रेयापेक्षा मुंबई महत्त्वाची आहे. मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे. त्याकरता कोत्या मनाची लोकं काय असतात आणि मोठ्या मनाची लोकं काय असतात हे यातून दिसून येतं. हे मी कधीच बोललो नसतो; परंतु ज्या लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तेच लोक याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलं खरं वाटतं. म्हणून आज मी हे सत्य सांगितलं आहे."
हेही वाचा :