छत्रपती संभाजीनगर : देश स्वतंत्र झाला तरी, अद्याप ग्रामीण भागातील समस्या सोडवल्या जात नाहीत असं म्हटलं जातं. मात्र, आता विभागीय आयुक्तांनी नवीन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 'एक दिवस गावकऱ्यांसोबत' ही संकल्पना राबवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. "आठवड्यातील एक दिवस एका गावात प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागातील अधिकारी जातील, तिथं लोकांच्या समस्या ऐकतील. ज्या अडचणी जागेवर सोडवणं शक्य आहे. त्या समस्या लगेच सोडवण्यात येणार आहेत. तर सरकारनं अनेक योजना लोकांच्या विकासासाठी आणल्या आहेत. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे." अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
एक दिवस गावकऱ्यांसोबत : "विभागीय आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात असणाऱ्या गावांमध्ये आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. 'एक दिवस गावकऱ्यांसोबत' असा हा उपक्रम आहे. या अंतर्गत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी प्रत्येक तालुक्यातील एक अशा 76 गावांमध्ये प्रशासकीय यंत्रणा गावात जाणार आहे. सकाळी 8 पासून दुपारी 2 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतमधील अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. हे सर्व अधिकारी गावातील अडचणी ऐकून घेणार आहेत. ज्या समस्या जागेवर सोडवण्यासारख्या असतील त्या लगेच सोडवल्या जातील. तर, ज्या समस्या वरिष्ठ पातळीवर सोडवाव्या लागतील त्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करतील." अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
100 दिवसांचा उपक्रम : "हा उपक्रम सुरुवातीला 100 दिवस चालवला जाणार आहे. प्रत्येक बुधवारी अख्खी यंत्रणा एकाच दिवशी एकाच वेळी मराठवाड्यातील 76 गावांमध्ये दाखल होईल. गावातील पिकांच्या अडचणी, पाणी टँकर परिस्थिती, दुष्काळ निवारण उपाययोजना, त्याचबरोबर लोकांच्या वैयक्तिक अडचणी ऐकून घेतल्या जाणार आहेत. पहिले 100 दिवस उपक्रमात एक हजारपेक्षा अधिक गावांमध्ये पोहचण्याचा प्रशासनाचा मानस आहे. प्रतिसाद चांगला राहिला तर, पुढंही हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील खऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. लोकांशी संवाद वाढला की, अनेक अडचणी सोडवण्यात मदत होईल." असा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला.
शासनाच्या योजनांची माहिती : आठवड्यातून एक दिवस प्रशासकीय यंत्रणा गावात गेल्यावर लोकांच्या समस्या ऐकून घेईलच, त्याचबरोबर शासनाच्या योजना गावात पोहोचवणार आहे. अनेक योजना ग्रामीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी घोषित केल्या जातात. मात्र, त्या योजनांची माहिती खोलवर पोहचत नाही. परिणामी बहुतांश लोक या योजनांपासून दूर राहतात. त्यामुळं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी गेल्यावर सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या योजनेचा दिवसभरातील पूर्ण आढावा तयार केला जाणार आहे, ज्या अडचणी सोडवण्यात आल्या नाहीत त्यांची माहिती विभाग स्तरावर मागवली जाईल आणि त्या सोडवण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत." अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
हेही वाचा :