मुंबई Lok Sabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघाची ओळख आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशीच केली जाते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इथून भाजपा उमेदवार रामदास तडस हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. महत्त्वाचं म्हणजे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये रामदास तडस यांच्या मताधिक्यात मोठी वाढ नोंदवण्यात आलीय.
वर्धा लोकसभेची रचना : वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसंच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी विधानसभाही वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. वर्धा जिल्ह्यात तेली समाजातील मतदारांचं सर्वाधिक प्राबल्य आहे. तसंच कुणबी मतदार देखील निर्णायक भूमिका बजावू शकतात. जिल्ह्यात 16 लाख मतदार आहेत. जिल्ह्यातील 4 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचं वर्चस्व आहे. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर देवळी मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.

काँग्रेसच्या सागर मेघेंचा पराभव : वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या ही 15 ते 16 लाख इतकी आहे. 4 पैकी 3 मतदारसंघांवर भाजपाचं वर्चस्व आहे. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर देवळी मतदारसंघ काँग्रेसकडं आहे. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये वर्ध्यातून भाजपाच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघेंचा 2,15,783 मतांनी पराभव केला होता. तर 2019 मध्ये काँग्रेसकडून प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. रामदास तडस यांची चारुलता टोकस यांना अडीच लाख मतांनी पराभूत केलं होतं.

तेली आणि कुणबी समाजाचं प्राबल्य : वर्ध्याचा विचार करता सर्व समुदायाचं संमिश्र प्रतिनिधित्व इथं पाहायला मिळतं. पण प्रामुख्यानं तेली आणि कुणबी या दोन समाजाचं प्राबल्य आणि मतदार मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये आहेत. तडस तेली समाजाचे मोठे नेते असल्यानं पवारांनी कुणबी उमेदवार देत ही लढत बरोबरीची होईल यासाठी डाव टाकला आहे. दलित, आदिवासी आणि मुस्लीम लोकसंख्याही याठिकाणी निर्णयाक ठरू शकते. अमर काळे यांची पक्षातील आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा आणि त्यांच्या मागे असलेला जनसंपर्क याबरोबर मविआच्या शक्तीचा वापर करून ही जागा मिळण्याच्या प्रयत्नात शरद पवार गट आहे.

मतदारसंघात काय आहेत समस्या : वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. कारण महात्मा गांधी यांची कर्मभूमी असणारा जिल्हा असल्यामुळं इथे उद्योग बंदी आहे. जिल्ह्यात पुरेसे उद्योग नसल्यामुळं तरुणांना कामधंद्याकरता नागपूरसह मुंबई आणि पुण्याकडं जावं लागतं. जिल्ह्यात शेतकरीवर्ग सर्वात मोठा आहे. मात्र, कृषी उत्पादनाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज आहेत. रस्ते आणि पाण्याची देखील समस्या मोठी आहे. या पायाभूत समस्येच्या मुद्द्यावरही मतदारांची नाराजी पाहायला मिळते.

वर्धा शहराची ऐतिहासिक ओळख : वर्धा या शहराचं नाव 'वरदा' नदीच्या नावावरुन पडलं आहे. पूर्वीच्या काळातील 'वरदा' नदी ही आज 'वर्धा' नदी नावानं ओळखली जाते. वर्धा शहराला फार मोठा प्रगल्भ इतिहास लाभलाय. ब्रिटीशांच्या काळात म्हणजे 1862 पर्यंत वर्धा शहर नागपूरचा एक भाग होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय कारणानं वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा इथं वर्ध्याचं जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलं. पण नंतर 1966 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आलं. स्वातंत्र्य लढ्यात वर्ध्याचं महत्व फार होतं. महात्मा गांधी यांनी वर्ध्यातूनचं स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. तर 1951 साली गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. या चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून ओळखलं जातं.

वर्धा महात्मा गांधीची कर्मभूमी : वर्धा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण वर्धा नावाच्या अवती-भवती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचं वलय आहे. वर्धा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. 1940 साली गांधीजींनी वर्धा शहराच्या अगदी लगत असलेल्या सेगाव या गावाचं नामकरण सेवाग्राम असं केलं होतं. तेव्हा पासूनच वर्धा शहराचं नाव इतिहासाच्या पानात अमर झालं असं म्हटल्यास वावगं ठरु नये. आजही वर्धेच्या सेवाग्राम येथे 'महात्मा गांधी' यांचा आश्रम अगदी दिमाखात उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनला होता. या ठिकाणी आजही त्या काळातील आठवणींच्या पाऊलखुणा शाबूत आहेत.
हेही वाचा -
- रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस यांची मारहाणीसह आरोपांची सरबत्ती, तडस यांनी सर्व आरोप फेटाळले - Pooja Tadas On Ramdas Tadas
- वर्धा लोकसभा मतदारसंघ : 'महात्मा गांधींच्या कर्मभूमी'त तिसऱ्यांदा कमळ फुलणार? काय असेल लोकसभेचं समीकरण
- शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head