छत्रपती संभाजीनगर Nilam Gorhe on Election : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रत्येक भागात मोठ्या संख्येनं उमेदवार उभे राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र, त्यावर लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक उमेदवार तोडगा काढतील असं मत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय. निवडणुकीत उमेदवार अर्ज का करणार आहेत हे विचारलं गेलं पाहिजे. कोणाला काही गैरसमज असतील आणि त्यातून ते निवडणूक लढवणार असतील तर त्यांची समजूत काढू. मात्र कोणाला विजयाची खात्री असेल तर त्यांना आपण थांबवू शकत नाही. यावर पूर्ण प्रक्रिया झाल्यावर बोलणं उचित राहील, असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोणाला वाटत असेल की बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यानं फायदा होईल असं कोणी सांगितलं असेल तर माहिती नाही. पण तसं होणार नाही अशी टीका देखील त्यांनी केली.
दुष्काळाबाबत बैठक : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेत मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेतला. अनेक सामाजिक संस्था अनेक प्रकारे मदत करायला समोर येतात. यात काही धोरणात्मक मदत देखील करतात. जे मुद्दे दिसले त्यातील आठ मुद्यावर सरकारनं उपाय काढले आहेत. त्यात प्रामुख्यानं विद्यापीठात दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी करावी. फी माफीची अंमलबजावणी करावी, नसेल केली तर कारवाई होईल. बीडसह विभागात 2,95,730 मजूर काम करत आहेत. त्यांना उन्हाचा तडखा बसू नये यासाठी उपाययोजना कराव्यात. 15 फेब्रुवारीला विभागीय आयुक्त यांनी चांगला जी आर काढला आहे, जे लोक अन्न वस्त्र निवारा यापासून वंचित आहेत त्याचे नियोजन करावे. काही जिल्ह्यात पाऊस पडलाय. परंतु इतर जिल्ह्यात नाही, दुष्काळ परिस्थितीवर उपाय योजना कराव्यात असे निर्देश देण्यात आल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे प्रयत्न : मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या कामावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांशी चर्चा केली ते काम सुरू आहे. काही काळात होईलच. जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचे काही अहवाल आहेत. त्यानुसार सरकार पाऊलं उचलत आहे. पर्यावरणप्रेमी देखील यासाठी पुढं येत आहेत. मोठ्या प्रकल्पांपेक्षा छोटे प्रयोग नेहमी यशस्वी होतात. पण मोठ्या योजनांसाठी वारंवार प्रयत्न करावा लागतो. कायम स्वरुपी उपाय योजना राबवण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या बाबत उभारी नावाचा प्रकल्प सरकारनं हाती घेऊन त्यातून मोठ्याप्रमाणात मदत सुरू केली आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.
महिला मतदारांसाठी मदत योजना : महिलांचं निर्भयपणानं मतदान व्हावं यासाठी महिलांशी संवाद साधला, मात्र मराठवाड्यात काही ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरातील महिलांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. ही छेडछाड रोखण्यासाठी शिवदुर्गा मोहीम आणि शिवदुर्गा पथक स्थापन करावं. महिला मतदारांची छेडछाड काढली असेल किंवा त्यांना त्रास दिला जात असेल, धमक्या दिल्या जात असतील रणरागिनी बनून लढावं निर्भयपणे महिलांनी मतदान करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत राहतील असं आश्वासन यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दिलय.
हेही वाचा :