हैदराबाद - पल्स हार्ट सेंटरचे संस्थापक संचालक आणि हैदराबादच्या मेडिकओव्हर हॉस्पिटलमधील संचालक आमचे तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट, डॉ. एम.एस.एस. मुखर्जी, एमडी, डीएम आणि डीएनबी कार्डिओलॉजी, (कार्डिओलॉजी विभाग) म्हणतात, 'निरोगी हृदयाची व्याख्या करणे कठीण असले तरीही ते नियमितपणे व्यवस्थित काम करते. हृदयाचे काम सुरू असताना कसलाही अडथळा येत नाही. निरोगी व्यक्तीच्या हृदयाची धडधड मिनिटाला 60 ते 100 असते. त्यांचा रक्तदाब 120/60 असतो. तरीही हृदयात काही दोष असेल तर तो सर्वच हार्टरेटमध्ये कळत नाही. त्यामुळे प्रत्येकानेच लक्षणे आणि वयानुसार वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.'
हृदयाच्या अवस्था
हृदयाच्या अनेक अवस्था असतात आणि डॉ. मुखर्जींनी त्यातल्या काहींबद्दल सांगितले.
- Ischemic हृदय रोग – यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो.
- Valvular हृदय रोग – यात 4 झडपा(वाॅल्व्ह)पैकी एकीमध्ये दोष असतो.
- Congenital हृदय रोग – हा जन्मापासून असतो.
- कार्डिअॅक रिदम डिस्ट्रबन्सेस – यात हृदयाचा आकार व्यवस्थित असतो. पण हृदयाचे ठोके हळू, जलद किंवा अनियमित पडतात.
- पेरिकार्डिअल रोग – यात पेरिकार्डिअल या हृदयाच्या आवरणाला त्रास होतो.
- एण्डोकार्डिटिस – हृदयाला संसर्ग. विशेष करून झडपांना संसर्ग होतो. अनेकदा हृदयाच्या आवरणालाही संसर्ग होतो.
- हृदयाचा कर्करोग – हा आजार अतिशय अपवादात्मक आहे.
- हृदयाच्या स्नायूंचा आजार – यात हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे हृदयाचे काम बिघडते.
हृदय रोगापासून दूर राहण्यासाठी काय करायचे?
डॉ. मुखर्जींनी सांगितलेले उपाय
- तुमच्या जोखमीचे आजार शोधा आणि त्यावर नियंत्रण ठेवा. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा इत्यादी आहेत.
- तुमच्या आहारातले मेद आणि कोलेस्ट्रोल हे घटक कमी करा.
- जास्त कार्बोहायर्डेड, मिठाई आणि दारू सेवन करून नका.
- ताजी फळे आणि भाज्या, पूर्ण धान्य, डाळी आणि ड्राय फ्रुट्स खा.
- अंडी खाऊ शकता.
- मटण खाण्याऐवजी चिकन खाण्याला प्राधान्य द्या.
- जेवणात तेल, तूप, लोणी यांचा वापर एकदम कमी करा. कारण यात चरबी खूप असते. तसेच मिठाचा वापर कमी करा.
- धुम्रपान अजिबात करू नका.
- दररोज व्यायाम करा. आठवड्यातून 5 दिवस तरी व्यायाम आवश्यक आहे. 30-45 मिनिटे जलद चालण्याचाही सल्ला दिला आहे.
- तुमच्या शरीराच्या वजनावर लक्ष ठेवा. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा कमी असावे.
- तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. वाढत्या तणावाचा वाईट परिणाम हृदयावर होतो.
तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली आणि अन्नाच्या सवयी अंगी बाणवल्या तर तुमचे हृदय निरोगी राहू शकते. तुमचे शरीर बिघाडाचे सिग्नल दाखवत असते. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांना भेटा.