यवतमाळ - शहरात कचरा टाकण्यासाठी जागेची उपलब्धता नसल्याने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौऱ्याच्या भितीने नगरपरिषदेकडून एमआयडीसी परिसरात कचरा टाकण्यात येत होता. यासंबंधीत जिल्हाधिकारी व पालकमंत्री मदन येरावार पाहणीसुद्धा केली होती. मात्र, येथील लघुउद्योजकांनी निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. यापुढे एमआयडीसीमध्ये कचरा टाकु नये असा पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये साडेचार हजाराची लाच घेताना वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नगरपरिषदेकडून एमआयडीसी परिसरामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यासंदर्भात कुठलेही आदेश घेण्यात आलेले नाहीत. एमआयडीसीमध्ये दीडशेच्या आसपास उद्योग सुरू आहे. त्यात ६ हजारांपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. कचरा साठवणूक करून त्याच ठिकाणी कचरा जाळण्यात येत असल्याने प्रदुषण वाढले आहे. शिवाय कचऱ्याला आग लावण्यात येत असून त्यामुळे मोठी दुर्घटनाही घडू शकते. याबाबत आपण पालकमंत्री मदन येरावार व जिल्हा प्रशासनाला लेखी स्वरूपात कळवले असल्याची माहिती उद्योजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयडीसीमध्ये अजुनही कचरा टाकण्यात येत आहे. उद्यापासून या परिसरामध्ये आम्ही नगरपरिषदेचा घनकचरा टाकू देणार नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिला. यावेळी आनंदकुमार भुसारी, संदीप गुनलीया, प्रकाश उदासी, उपअभियंता मयुरी पवार उपस्थित होत्या.
पार्श्वभूमी -
दोन वर्षांपासून कचरा संकलन करण्यासाठी जागा नाही. यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांनी आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, यावर ठोस उपाययोजना आणि नगरपालिकेचा अनागोंदी कारभार असल्याने कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.