यवतमाळ - धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी दिग्रस तालुक्यात या दोन्ही घटना घडल्या. मनीष अनिल राठोड आणि दिनेश प्रकाश भेंडे अशी या तरुणांची नावे आहेत.
काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे दिग्रस शहरापासून जवळच असलेले नांदगव्हाण धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे नांदगव्हाण धरणाला पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे. दिग्रस येथील पाच तरुण नांदगव्हाण धरणात पोहण्याचा प्रयत्न करत होते. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न लागल्याने मनीष अनिल राठोड हा बुडाला.
अरुणावती प्रकल्पदेखील ९९ टक्के भरल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे पाणी बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. धरणाच्या दरवाज्या समोरील टाक्यात पोहण्याच्या उद्देशाने उडी मारणारा चिरकुटा येथील तरुण दिनेश प्रकाश भेंडे हा बुडाला. बुडालेल्या या तरुणांचा शोध सुरू आहे.