यवतमाळ - महाराष्ट्र शासनाने 28 जूनपासून सलून दुकाने सुरू परवानगी दिली. पण, दाढी करु नका अशी ताकीद दिली. हा निर्णय सलून असोसिएशनला मान्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सलून असोसिएशनने घेतला आहे.
फक्त केस कापण्याच्या अटीवर 28 जूनला राज्यातील सर्व केशकर्तनालय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील पाच टक्के सलून कारागिरांनी समाधान व्यक्त केले तर 95 टक्के सलून कारागीर नाराज झाले. केवळ केस कापल्याने चार महिन्याची भरपाई भरून निघेल काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कटींग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही. शासनाने घेतलेला निर्णय एकदम चुकीचा आहे. सलून चालकांनी जगावे की मरावे आधीच महाराष्ट्रात पाच सलून बांधवांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या आहेत. अजून पून्हा आत्महत्या झाल्यास याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे सलून संबंधीत कामे कशी करावे, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे. तीन महीन्यापासून दुकाने बंद आहेत दुकानाचे भाडे थकीत आहे. त्यामुळे भाडे माफ करावे अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा सलून असोसिएशन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष संजय मादेशवार, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा सचिव संतोष मोतेवार यांसह व्यावसायिक उपस्थित होते.
हेही वाचा - पत्नीचे मंगळसूत्र विकून खरेदी केलेले सोयाबीनचे बियाणे बनावट; दुबार पेरणीची वेळ