यवतमाळ - महिलेवर अत्याचार, अपघात, मोठी दुर्घटना, आग यासारख्या आपत्कालीन संकटात नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्यात 'प्रोजेक्ट 112' लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात असून, या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू झाले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळवून देणे, हे पोलीस विभागाचे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी राज्यातील दोन हजार चारचाकी तर अडीच हजार दुचाकी वाहनांवर आवर्ती जीपीएस सिस्टिम लावण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणावरून माहिती मिळाली तर संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचू शकेल. यवतमाळ जिल्ह्यातील 232 जणांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.
राज्यात लवकरच पोलीस भरती
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. 12 हजार 200 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदासाठी ही भरती असणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे जणांच्या भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. तर लवकरच दुसऱ्या टप्प्याला देखील सुरुवात होणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.