यवतमाळ - यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागवा. सोयाबीनचे पीक करपले. यानंतर कापसावर बोंडअळीने आक्रमण केले. अनेक ठिकाणी कापसाला मोड आले. परतीचा पाऊस लांबल्याने शेतांची तळी झाली. आता ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकरी संकटात सापडला आहे. एकातरी पिकाचे उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. मात्र, आता ती देखील धुळीस मिळाली आहे.
ढगाळ वातावरणाचा फटका
वातावरणात बदल झाल्याने त्याचा परिणाम तुरीवर होत आहे. दमट वातावरणामुळे थंडी गायब झाली. हवामान बदलाचा तूर पिकाला फटका बसला आहे. दरम्यानच्या कालावधीत अवकाळी पावसानेही हजेरी लावली. ढगाळी वातावरणासह धुक्याने तुर पिकांचा फुलोराही गळून पडत आहे. तूर पिकाला लागलेल्या कोवळ्या तुरीच्या शेंगांमध्ये अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळत आहे. सोयाबीन, कपाशीनंतर शेतकर्यांची अपेक्षा तुरीवर होती. परंतु अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांची निराशा झाली आहे.
वीजेअभावी सिंचनाचा प्रश्न
अवकाळी पाऊस, ढगाळी वातावरण व धुवारीने शेतातील तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरडवाहू शेतातील पीक वाळून जात आहे. सोयाबीन, कापसानंतर तुरीचाही फटका शेतकर्यांना बसत आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतात पाणी असूनही विजेअभावी सिंचन करता येत नाही.