यवतमाळ - केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज किसान काँग्रेसच्या वतीने मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने तातडीने कृषी कायदा रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात ही मशाल रॅली काढण्यात आली. आझाद मैदानावरील जयस्तंभापासून या रॅलीला सुरुवात होऊन, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर, चंद्रकांत चौधरी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.