वर्धा - आर्वी तालुक्यातील सावद(हेटी) येथे नाल्यावरून पाणी वाहत असल्याने उपचाराअभावी 16 वर्षीय मुलीने काठावरच प्राण सोडले. जयती गेंदालाल सोलंकी असे मृत मुलीचे नाव आहे.
जयतीला रात्रीच्या वेळी सर्पदंश झाला. हे लक्षात येताच कुटुंबियांसह गावकऱ्यांनी दवाखाण्याकडे धाव घेतली. पण, नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्यातून वाट काढता न आल्याने जयतीने नाल्याच्या काठावरच जीव सोडला. अखेर तिचा मृतदेहच घरी न्यावा लागला. या घटनेमुळे सोलंकी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सावद हेटी या वस्तीतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी नाला पार करावा लागतो. पावसाळ्याचा दिवसात अनेकदा या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडते. यासाठी अनेकदा मागणी करूनही या नाल्यावरील पुलाची उंची वाढण्यात आलेली नाही. या गावातून जवळपास २५ विद्यार्थी दररोज शाळेत जातात. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबाण्याची वेळ अनेकदा आली आहे. पावसाळ्यात मुले घरी परत येईपर्यंत आई-वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
हेही वाचा - छत्रपती शिवरायानंतर नरेंद्र मोदीच जाणते राजे - माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर
नाल्याच्या वरच्या बाजूला दहेगाव लघु धरण आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहत राहते. दुसरा पर्याय नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दरम्यान, जयतीच्या मृत्यूने तरी निद्रिस्थ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जगतील का, असा संतप्त सवाल स्थनिक नागरिक करत आहेत.