वर्धा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा घेण्यात येते. यातील २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत आयोगाने ८२८ जणांची नियुक्ती केली होती. यात भविष्यातील रिक्त पदाची गरज पाहता २३० पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचे जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील ६३६ उमेदवार असून वर्धा पोलीस विभागातील पाच जणांच्या खांद्यावर दोन स्टार लागणार आहे. या पाच जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
पोलीस विभागात आरक्षणावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विभागीय परीक्षेत पुन्हा आरक्षणाचा लाभ दिला जात नाही. मात्र २०१६ मध्ये काहींना लाभ देत त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र इतर काहींना २३० गुण मिळून सुद्धा आरक्षणाचा पुन्हा लाभ न देता नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर काही उमेदवारांनी हरकत नोंदवल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. याचा तिढा सुटला असून २०१६ मध्ये २३० गुण मिळवलेल्या ६३६ जणांना पदोन्नती मिळाली.
वर्ध्यातील सायबर सेलला कार्यरत असणाऱ्या निलेश कटोजवार, अक्षय राऊत, वडनेरला कार्यरत विक्रम काळमेघ, गिरड येथील रामेश्वर दराडे, पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला प्रतिभा निनावे यांना पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.