वर्धा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये 'जय श्रीराम'च्या नाऱ्यावरून चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. यावर भाजप ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहलेले 10 लाख कार्ड देशभरातून पाठवणार आहे. असे असताना वर्ध्यातूनही 5 हजार पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, हा वाद आता आणखी वाढण्याचे चित्र दिसून येत आहे.
हिंदू धर्माचे दैवत प्रभू रामचंद्र यांच नाव घेणे, नामस्मरण करणे, हा आमचा अधिकार आहे. याकारणाने ममता दीदींना एवढा त्रास का होत आहे ? असा सवाल भाजपच्या युवा मोर्चाकडून विचारला जात आहे. करोडो हिंदूचे आराध्य दैवत मर्यादापूरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे नामस्मरण हे दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बंगालमध्ये जय श्रीराम नाऱ्यावरुन भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यात वाद झाला. यामुळे ममता बॅनर्जींना जय श्रीरामचे हस्तलिखित पोस्ट कार्ड निषेध म्हणून पाठवले जाणार आहे. हे लिहिण्याचे काम भाजप कार्यालयात भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे. वर्ध्यातून 5 हजार कार्ड लिहून पाठवून हा संकल्प पूर्ण करणार असल्याचे सरचिटणीस पाठक यांनी सांगितले.