ठाणे Malodi Toll Naka : एकीकडे राज्यभर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून हिंसक आंदोलने सुरु असतानाच, भिवंडीत राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे ) कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका (Malodi Toll Naka) फोडल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे अंजुरफाटा ते चिंचोटी रस्त्यावर (Mankoli Anjurphata Chinchoti Road) प्रचंड खड्डे आहेत. हे खड्डे बुजवल्यानंतर टोलवसुली करावी असं वारंवार सांगून देखील, टोलवसुली सुरू असल्यानं टोलनाका फोडण्यात आला. या आंदोलनात खारबाव गावचे माजी सरपंच महेंद्र पाटील व पाये गावचे उपसरपंच यांनी कार्यकर्त्यासह टोलनाका फोडला आहे. रस्ते दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा सांगूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने, मालोडी टोलनाका फोडला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच जोपर्यंत रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत टोलनाका सुरू करण्यात येऊ नये अशी मागणीही, यावेळी करण्यात आली आहे.
या पूर्वीही मालोडी टोल नाक्याची तोडफोड : भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही २० ऑगष्ट रोजी भिवंडी तालुक्यातील वसई मार्गावरील खारबाव कामण रस्त्यावरील मालोडी टोल नाक्याची तोडफोड मनसे कार्यकर्त्यानी केली होती. त्यांनतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या रस्त्याची पाहणी करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही खड्डे जैसे थे असल्याने १ सप्टेंबरला कशेळी नाक्यावरच मनसेने प्रशासनाचं श्राद्ध, अधिकाऱ्याविरोधात मुंडन आंदोलन करून टोल बंद केला होता.
इशारा आंदोलन करूनही टोलवसुली सुरूच : ठाणे-भिवंडी मार्ग बीओटी तत्वावर तयार करण्यात येऊन या मार्गवरील कशेळी गावाच्या हद्दीत टोलनाका उभारून याठिकाणी वसुली सुरु केली. मात्र रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने, नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अंजुर फाटा ते कशेळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो. अनेकांना मानेचा, कमरेचा, पाठीच्या आजाराला देखील समोरे जावे लागत आहे. अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केले जाते? असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -