ठाणे : शहापूर तालुक्यातील चांदा गावात अमावस्येच्या रात्री बेपत्ता असलेल्या तीन तरुणांनी अघोरी विद्येच्या नादात आत्महत्या केल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. इतकेच नव्हे तर, त्याच झाडाला चौथ्या व्यक्तीनेही गळफास घेतल्याचे आढळल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरवण्यात आली. त्यामुळे पोलीस प्रशासन पुरते चक्रावले आहे. घटनेला तीन दिवस उलटून गेले तरीही त्यांची हत्या की आत्महत्या, या प्रश्नाचे गूढ कायम आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहवयास मिळाले आहे.
मित्रांची चौकशी सुरू..
बेपत्ता झालेल्या तिघांच्या मित्र परिवारालादेखील पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तर काही संशयिताना गाव सोडून न जाण्याची नोटीस बजावून त्यांना सोडून दिले आहे. मृतक नितीन भेरे याला मंत्र-तंत्राचं आकर्षण होतं त्याच्या घरात देव -देवताच्या मूर्ती आणि पूजाअर्चा करण्याचे साहित्य आहे. हे तिघेही बऱ्याच वेळा धार्मिक ठिकाणी एकत्र यायचे, अशी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होती. मृतक नितीन, मुकेश आणि महेंद्र यांची अंधश्रद्धेतून आत्महत्या की हत्या याबाबत उलट-सुलट चर्चादेखील परिसरात रंगत असल्याने पोलीस चक्रावले आहेत.
चौथ्या गळफासाच्या अफवेने पोलीस चक्रावले..
याशिवाय घराबाहेर पडलेल्या तरुणांच्या एकाच झाडावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेहांमुळे अनेकांनी तर्कवितर्क लावून संशयाचे भूत उभे केले आहे. तर दुसरीकडे पोलिसांना या प्रकरणी अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याने नातेवाईक संभ्रमात पडले आहेत. चौथा गळफास झाडाला सापडल्याच्या अफवेबाबत पोलिसांनी खुलासा केला नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. गळफासाची घटना आणि रंगलेल्या चर्चा यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तिघांनी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक स्तरावर दिसून येत आहे. या प्रकरणात उलट सुलट अफवा पसरवू नये. तसेच, याबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी गुप्त पद्धतीने संपर्क साधावा, असे अहवान शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे.
शुक्रवारी घटना झाली उघड..
शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खर्डी पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत २० नोव्हेंबरला मामा-भाचे व शहापूर येथील एकाने चांदा गावाजवळील जंगलात एकाच झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. रविवारी त्याच झाडाला आणखी एका व्यक्तीचा गळफास घेतल्याच्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याच्या अफवेची भर पडली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली आहे.