ठाणे - मीरा भाईंदर शहरातील मालमत्ता कर भरण्यासाठी पालिका प्रशासनाने अभय योजना २०२१ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता कर भरणाऱ्या आस्थापनांसाठी करावरील व्याजावर ७५ टक्के माफी मिळणार आणि २५ टक्के दंड भरावे लागणार आहे. मीरा भाईंदर परिसरात या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - काशिमिरा पोलिसांकडून ५२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
२५ फेब्रुवारी ते १५ मार्च कालावधी
महानगरपालिकेच्या वतीने २५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२१ या २० दिवसांच्या कालावधीमध्ये ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवली जात आहे. यामध्ये थकित मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराची २५ टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांची ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे.
या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तास प्राप्त अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकित कर असणाऱ्या, तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
कोव्हिड - १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, थकित मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणी देखील करदात्यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जे नागरिक व मालमत्ता धारक 'अभय योजना' कालावधीत मालमत्ता कराचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदार मालमत्ता करधारकांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत मालमत्ता जप्त करणे, मालमत्तेचा लिलाव करणे व इतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मीरा भाईंदर मनपा महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.
हेही वाचा - भिवंडीत लाकडाच्या कारखान्याला भीषण आग