ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परराज्यातील कामगारांनी पायी घरची वाट धरली आहे. 'कोरोना की महामारी और बढत जारी है, इसके चलते हमने ये कदम उठाया', असे एका मजुराने यावेळी सांगितले. लॉकडाऊनमुळे मुरबाड शहरात अडकून पडलेल्या ३५ परप्रांतीय कामगारांनी नव्या सायकली खरेदी करून १ हजार ८०० किमी अंतर असलेल्या झारखंड राज्यातील गावी सायकलवरून जाण्याचा निश्चय केला आहे.
केंद्र सरकारने परप्रांतीय कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन गेल्या आठवड्यापासून सुरू केल्या आहे. त्यामध्ये बिहार, उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आदी राज्यांमध्ये ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. मात्र, ठाणे जिल्ह्यातून झारखंड राज्यात जाणारी आत्तापर्यत एकही श्रमिक ट्रेन सोडली गेली नसल्याचे या कामगारांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाचा आजार अधिकच झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, मुरबाडमध्ये अडकून पडलेल्या या ३५ कामगारांनी तब्बल १ हजार ८०० किमी अंतर असलेल्या झारखंड राज्यातील आपल्या मुळगावी जाण्यासाठी ७ ते ८ हजार रुपयांच्या २ ते ३ नवीन सायकली खरेदी करत प्रवासाला सुरुवात केली आहे.