ठाणे : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारला या मार्चबाबत ठोस निर्णय घेता आला नाही. त्यातच एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक मागण्यांवर ठाम आहेत.
किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. वन जमिनीचे प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना, शेत मालाला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. तूर्तास गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यांचा वाशिंद येथे मुक्काम : लॉंगमार्चमध्ये हजारो शेतकरी, कष्टकरी ,भूमीहीन, आदिवासी बांधव सहभागी झालेले असून त्यांचा वाशिंद येथे मुक्काम आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कोसळलेला मुसळधार अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सकाळपासून जाणवणारे उन्हाची चटके सोसत हजारो शेतकरी वाशिंद येथे मुक्काम ठोकून आहेत.
शुक्रवारी नाशिक जिल्हातील माऊडी गावातील शेतकरी कुंडलिक जाधव यांना काल दुपारपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना औषध गोळ्या दिल्या होत्या. मात्र सायंकाळच्या सुमारास अधिकच अस्वस्थ वाटत असल्याने उलट्या होऊ लागल्याने त्यांना प्रथमउपचार देऊन रात्रीच्या सुमारास शहापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार करण्यापूर्वीच येथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे कुंडलिक जाधव यांचा मृत्यू झाला तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांचे मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशी मृताच्या नातेवाईकांची ठाम मागणी आहे.
पायी चालण्याने काही शेतकरी पडले आजारी: शेतकरी कुंडलिक जाधव यांच्या कुटुंबाला सरकारने मदत करावी अशीदेखील मागणी त्यांचे भाऊ रामदास गांगुर्डे यांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, लाँग मार्चमध्ये आपल्या मागण्यासाठी पायी चालणाऱ्या काही शेतकरी आजारी पडले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पायी चालणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पायाला सूज येऊन दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मलमपट्टी करून उपचार केले जात आहेत.