ठाणे - कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असतानाच मुंब्र्यात मात्र पोलीस आणि राज्यकर्त्यांमध्येच जुंपल्याचे वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. मंगळवारी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी 13 बांगलादेशी नागरिकांना पकडून या सर्वांची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले असल्याची माहिती दिली होती. मात्र, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्र्याचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वृत्ताचे खंडन केले व ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे.
मुंब्रा येथून एकही बांगलादेशी नागरिक पकडला गेला नाही. तसेच अलीकडे कोणतीच व्यक्ती दिल्लीतील निजामुद्दीन येथे गेली नाही, असे सांगत आव्हाड यांनी पोलिसांनाच खोटे पाडले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे खुद्द मंत्र्यांनीच सांगितल्याने जनतेमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, देशात लॉकडाऊन असताना देशातील विविध मशिदींमधून तबलीकी जमातचे शेकडो लोक एकत्र राहत असल्याचे आढळून आले आहे. महत्वाचे म्हणजे त्यात शेकडो परदेशी नागरिक देखील अवैधरित्या राहात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याच धर्तीवर मंगळवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्र्यातील एका मशिदीची तपासणी केली असता, तिथे 13 बांगलादेशी नागरिक आणि 2 आसामचे नागरिक रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
परंतु आता आव्हाड आणि पोलिसांनी केलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे शासकीय यंत्रणा आणि नेत्यांमध्ये समन्वयच नसल्याचे चित्र दिसत आहे. खरी आणि खोटी बातमी कोणती याबाबत संभ्रमावस्था पसरली असून याबाबतचा खुलासा लवकरच व्हावा, अशी अपेक्षा सामान्य नागरिक करत आहेत.