ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले. आव्हाड यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. यावेळी त्यांनी, कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे. जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन केले.
जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यावर त्यांनी मात केली आहे. आयसीएमआरच्या संशोधनामध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा उपचारासाठी लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी ब्लडलाईन रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मा दान केले. यावेळी कोरोनावर मात केलेले शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील आव्हाड यांच्यासोबत प्लाझ्मादान केले. यावेळी आव्हाड म्हणाले, जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. तर, आनंद परांजपे यांनी, आम्ही कोरोनावर मात केली आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठीच आम्ही प्लाझ्मा दान केले आहे. या निमित्ताने आपण कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करत आहोत, असे सांगितले.
दरम्यान, ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. तर, वाढदिवसाच्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आपला प्लाझ्मा दान करुन बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात करणार आहेत, अशी माहिती ब्लड लाईनच्या डॉ. शिल्पा जैन यांनी दिली. दरम्यान, ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालसोपार्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान 100 जणांचे प्लााझ्मा साठवणे शक्य होणार आहे, अशी माहिती डॉ. जैन यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स लावू नये. त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, मास्क वाटप असे उपक्रम राबविले.