ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आसनगाव नजीक वेहलोळी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका प्लास्टिकच्या कारखान्याला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एस. के. वाय. नावाचा हा प्लास्टिकचा कारखाना असून मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही आग अचानक लागली.
आगीत लाखोंचे नुकसान
आगीत आतापर्यंत कारखान्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर औद्योगिक वसाहतीचा असल्याने आग इतरही कारखान्यांना पसरण्याची भीती निर्माण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.