ठाणे - येथील ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ रिक्षा प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने ठाणे शहरात प्रथमच ई-रिक्षा धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आखलेला खासगी ई-रिक्षाचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. तो चार-पाच दिवसांत सुरू होणार आहे.
भारतातील रेल्वे स्थानकामधील पहिले बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग स्टेशन आणि स्वॅप बॅटरी तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांचे स्टेशन मध्य रेल्वेने उभारले आहे. सध्या ठाणे स्थानकात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेले हे स्टेशन येणाऱ्या काळात सर्व मोठ्या स्थानकांवर असेल. तसेच याठिकाणी खासगी 3 चाकी आणि दुचाकी गाड्या चार्ज करता येतील. या चार्जिंग स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे मध्य रेल्वेने तीस इलेक्ट्रिक रिक्षा याठिकाणी सुरू केल्या आहेत. या इलेक्ट्रिक रिक्षा महिला चालवणार आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या रिक्षा इलेक्ट्रिक असल्या तरी त्या चार्जिंग करण्यासाठी या स्टेशनवर तासनतास उभ्या करून ठेवाव्या लागणार नाहीत. त्यांची बॅटरी संपल्यास ती बॅटरी काढून दुसरी पूर्ण चार्ज असलेली बॅटरी त्याठिकाणी लावता येईल. त्यामुळे केवळ दोन मिनिटात रिक्षा पुन्हा सेवेत सज्ज होईल.
रिक्षाचे वैशिष्ट्य -
एका पूर्ण चार्ज बॅटरीवर रिक्षा 60 किलोमीटर प्रवास करू शकते. तसेच ही रिक्षा 350 किलो वजन वाहू शकते. कोणताही आवाज न करता पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या या रिक्षा चालवण्यासाठी महिलांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका जपानी कंपनीच्या तंत्रज्ञानावर या रिक्षा धावणार आहेत. मुंबईसारख्या परिसरात वाढणारे प्रदूषण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
हेही वाचा - मजूर ते कला क्षेत्रात पद्मश्री, मध्यप्रदेशातील भूरीबाई यांचा प्रेरणादायी प्रवास
अनेकदा या थांब्याबाहेर रिक्षाचालक येऊन प्रवाशांची वाट अडवीत असतात. नव्याने ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांना मीटरपेक्षा जादा दर आकारून लुटण्याचे प्रकारही शहरात घडले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरल्याक्षणी रिक्षांचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. या रिक्षांमुळे शहरात प्रदूषण होणार नाही. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास लवकरच शेकडो रिक्षा शहरात धावू शकतील, असे संबंधित कंपनी अधिकारी सांगत आहेत. तर रेल्वेने या प्रकल्पासाठी जागा दिली आहे. तेथे रिक्षाची बॅटरी चार्जिग करण्यासाठी केंद्रही असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
या रिक्षा उभ्या करण्यासाठी स्थानक परिसरातील वाहनतळाजवळ जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी ई-रिक्षांच्या बॅटरीही चार्ज करण्यात येतील. या रिक्षासेवेमुळे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीलाही आळा बसू शकेल.
असे असेल चार्जिंग स्टेशन -
- या सेवेतील रिक्षा ‘लीथ पावर’ कंपनीच्या असतील. या रिक्षामध्ये चार बॅटऱ्या वापरण्यात येणार आहेत. बॅटरी एकदा चार्च केल्यानंतर ती ६० किलोमीटपर्यंत चालेल
- बॅटरी संपल्यानंतर ती ठाणे स्थानक, तीन पेट्रोल पंप आणि मानपाडा कोठारी कंपाऊंड येथील केंद्रावर अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदलणे शक्य होणार
- एखादी रिक्षा रस्त्यात बंद पडल्यास अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होईल. बॅटरीवरील या रिक्षांमुळे प्रदूषणही होणार नाही
- 100 रुपयांमध्ये बॅटरी चार्ज होणार आहे. या 100 रुपयात 60 किलोमीटर रिक्षा चालणार आहे.