ठाणे - कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या 10 गावातील ग्रामस्थ व तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे आजही जीवघेणा प्रवास ( Dangerous Journey of Villagers ) करावा लागत आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी अनेकादा लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली मात्र अद्याप याठिकाणी पुलाचे काम झालेले नाही, त्यामुळे प्रत्येकाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लवकर प्रशासनाने गावकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
येण्याजाण्यासाठी बांधलेली पायवाट गेली वाहून -
उल्हास नदीच्या काठावर आपटी गाव वसलेले आहे. शेती हाच गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी 10 गावातील तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जाताना उल्हास नदीतून प्रवास करीत होते. त्यातच उल्हास व बारवी नदीचा संगम नजीक जांभूळ एमआयडीसीने येथे पाणसाठवण बंधारा बांधला आहे. त्यातच वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेल्या शहरांना पाणीपुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसीने आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील गावकऱ्यांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मिटर रुंंदीची साधारण 500 मीटर लांबीची पायवाट बनवून दिली होती. येथूनच गावकऱ्यांची ये जा सुरू होती. परंतु मागील एक दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या पायवाटेचा काही भाग वाहून गेला आहे.
जीवमुठीत घेऊन प्रवास -
आपटी गावातील तरुण, महिला याच पायवाट मार्गे अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसीत पोटाची खळगी भरण्यासाठी ये जा करीत आहेत. मात्र पायवाट रस्ता पुरात वाहून गेल्याने बहुतांश तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी १८ किमी अंतरचा प्रवास करून जावं लागत आहे. यामुळे वेळसह आर्थिक फटका बसत असून आदीच लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले होते. तर ज्या तरुणांचे रोजगार होते ते या रस्त्याच्या अडचणीमुळे जाणार असल्याचे सांगण्यात आले. गावातील तरुण, महिला, मुले आणि वयोवृद्ध व्यक्ति आजही जीवघेणा प्रवास करीत आहेत. जर नदीच्या वाहून गेलेल्या रस्त्यावरूनच प्रवास करताना थोडा जरी तोल गेला तर उल्हास नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची भिती असल्याने गावकरी जीवमुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
नावाजलेल्या अधिकाऱ्यांचे गाव -
आपटी ग्रामपंचायत उपसरपंच कमलाकर नाथा भेरले यांनी सांगितले कि, दीड हजार लोकसंख्येच्या आपटी गावातून राष्ट्रपती पोलीस पदक घेणारे व केंद्रात पोलीस महानिरीक्षक म्हणुन नावाजलेले डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलीस प्रशासनात एक वेगळा आदर्श निर्माण केला. अश्या नावाजलेल्या अधिकाऱ्यांचे गाव असून प्रशासनाने ग्रामस्थाच्या समस्याची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा - Thane Water Cut : ठाणेकरांसाठी खुशखबर, जिल्ह्यात यंदा पाणीकपात नाही