सोलापूर- देशात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली असताना पंढरीच्या विठ्ठलाची बुधवारी चंदन उटीच्या पूजेची सांगता करण्यात आली. मागील ३ महिने उन्हापासून विठुरायाला दिलासा मिळावा यासाठी मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणीला चंदनाचा लेप लावण्यात येत होता.
पावसाळ्याचे आगमन होत असताना हवामानातील उष्णता कमी झाली आहे. त्यामुळे देवाला लावण्यात येणारा चंदनाचा लेप बुधवारपासून बंद करण्यात आला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुंदलवाड यांच्याहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक चंदन उटी पूजेने सांगता झाली.
विठ्ठलाच्या चंदन उटीच्या पूजेचे औचित्य साधून पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पांढऱ्या शुभ्र सुवासिक मोगरा व गुलाब फुलांची आरास केली. यामध्ये देवाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी सभामंडप पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांनी व सुवासाने दरवळून निघाला होता. तसेच श्री विठ्ठल चरणी अंथरलेला गुलाब पाकळ्यांचा गालिचा अतिशय सुंदर दिसत होता. उन्हाळ्यातील शेवटच्या चंदन उटी पूजा झाल्यानंतरचे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.