सोलापूर- 'आजपर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. मात्र, भाजपने तो दाखल केला. सीबीआय,आयबी, ईडी या सरकारी यंत्रणेचा वापर हे सरकार करत आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जेलमध्ये टाकले अनेकांवर गुन्हे दाखल करत कारवाई केली,' असा आरोप शरद पवार यांनी पंढरपुरातल्या सभेत केला.
हेही वाचा- धक्कादायक; उपचारासाठी पैसे नसल्याने पीएमसी बँक ग्राहकाचा मृत्यू
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पवारांनी भाजप सरकारकडून होणारा सरकारी यंत्रणाचा वापर यासह इतर मुद्द्यावर चौफेर टीका केली. तरुण पिढीच्या हाताला काम दिले पाहिजे होते. मात्र, या पाच वर्षात निम्मे कारखाने बंद झाले आहेत. अनेक कारखाने आजारी आहेत. सरकार कोणतेही याबाबत ठोस पाऊल उचलत नाही, असा गंभीर आरोप पवार यांनी यावेळी केला. आदर्श नवीन पिढी निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज असताना हे पुस्तकातून महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम हे सरकार करीत आहे. या सरकाने कोणतेही आश्वासन पाळले नाही. मग ते शिवाजी महाराज स्मारकाचे असो किवा बाबासाहेबांच्या स्मरकाचे, असा आरोपही पवारांनी केला. या सभेत तरुणाईचा प्रचंड जोश दिसून आला. हे पाहून स्वतः पवारही आवक झाले होते.