सोलापूर - आषाढी वारीत आरोग्याच्या दृष्टीने भाविकांनी आणि जनतेने पंढपुरात येऊ नये. घरातूनच विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते कोरोनाच्या आढाव्यासाठी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्री देशमुख यांना दिली. शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा अखंडीत ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले. पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंढरपूर येथे केले.
देशमुख म्हणाले, 'मानाच्या पालख्या 30 जून रोजी पंढरपूर येथे मठात मुक्कामास येतील. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच, 1 जुलै रोजी चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सर्व मानाच्या पालख्या आपआपल्या मठात विसावतील. 2 जुलै रोजी सर्व मानाच्या पालख्या विठ्ठल मंदीर येथे दर्शनासाठी येतील. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या आपल्या गावी मार्गस्थ होतील.'
कोरोनामुळे जगावर, देशावर तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. हे कोरोनाचे संकट लवकरात-लवकर दूर कर, असे साकडे महाद्वार चौकातून विठ्ठल-रुक्मिणी चरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घातले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी घेतली हुतात्मा सुनील काळेंच्या कुटुंबीयांची भेट
हेही वाचा - सोने दुकान मालकाने कामगारांवर ठेवला भरवसा; सोने घेऊन फरार झालेले आरोपी जेरबंद