पंढरपूर (सोलापूर) - सासू-सुनांमधील वादाची कहाणी प्रत्येक घरा-घरांमध्ये असल्याचे दिसून येते. सासू-सुनातील वाद घरापासून ते थेट न्यायालयाच्या दारापर्यंत गेल्याचेही आपण पाहिले आहे. सासू-सूनचे हे नातं केवळ भांडण्यासाठी आहे, असा समज काहींनी जणू मनोरंजनासाठीच सर्वत्र पसरवून ठेवलाय. याला छेद देत मायेच्या एका धाग्यात ओवलेल्या मुंढे कुंटूबांची माळ तुटली. प्रेमळ असणारी सासूबाई या माळेतून निखळल्या. यावेळी सासुबाईंच्या पार्थिवाला चारही सुनांनी खांदा दिला. परंपरेला छेदणारा सासू-सुनांच्या नात्यातील नव्या संबंधांना दिशा देण्याचे काम सुनांनी केले आहे.
आधुनिक विचारांची कास धरणारे मुंडे कुटुंबीय -
बार्शी तालुक्यातील माळेवाडी गावातील मुंडे कुटुंबाने समाजासमोर सासू-सून यांच्या नातेसंबंधातील एक आदर्श समोर ठेवला आहे. सासू दमयंती कारभारी मुंडे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. दमयंती यांना अध्यात्माची आवड होती. दमयंती यांचे पती कारभारी मुंडे हे शिक्षक होते. त्यामुळे आध्यात्मिक बरोबर शिक्षणाची जोड देण्याचे काम दमयंती यांनी आपल्या कुटुंबाला केले. त्यांनी आपल्या चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंढे आणि मनोरमा बळवंत मुंढे यांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव दमयंती यांनी करून दिली होती. त्यामुळे घरामध्ये सासू-सुनांच्या नातेसंबंधात आपलेपणाचा धागा निर्माण झाला होता. सासू असणाऱ्या दमयंती यांच्याकडून सुनांना कायम मुलींप्रमाणे प्रेम अन् माया मिळाली.
राजकारणातील आदर्शवादी सासूबाई -
दमयंती मुंडे यांना राजकीय वारसा मुंडे कुटुंबातूनच मिळाला होता. नव्वदच्या दशकामध्ये मुंडे कुटुंबातील सदस्य हे गाव पातळीवरील राजकारणामध्ये सक्रिय होते. दमयंती मुंडे यांनी 1990 ते 95 च्या काळात पंचायत समितीच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. तालुका स्तरावरचे राजकारण करत असताना दमयंती मुंडे यांनी आपल्या घराचा डोलारा ही त्याच जिद्दीने सांभाळला आहे. गाव पातळीवर विविध योजनांचा लाभही गावाला करून देण्यात दमयंती मुंडे यांचा मोठा हात आहे. यामध्ये त्यांनी चारी सुनांना एक प्रकारचा आदर्शही घालून दिला होता.