सोलापूर - पाच लाखांच्या खंडणीसाठी सोलापूरमधल्या बसवेश्वर नगर येथील सहा वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. याबाबतची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे.
यश दीपक कोळी असे अपहरण करण्यात आलेल्या या चिमुकल्याचे नाव आहे. आरोपीने बसवेश्वर नगरमधून दीपकचे अपहरण केले व त्याच्या वडिलांना 5 लाख रुपये घेऊन स्मशानभूमीत बोलावले. मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच दीपक कोळी यांनी याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्वरित हालचाल करून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपी सागर गायकवाड याचा शोध घेऊन, मुलाची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी आरोपीला केले अटक
होटगी रोड येथील साखर कारखान्याजवळ बसवेश्वर नगरात सोमवारी ही घटना घडली होती. दीपक शिवाजी कोळी यांचा मुलगा यश दीपक कोळी (वय 6 वर्ष, रा.बसवेश्वर नगर, होटगी रोड, सोलापूर) हा सायंकाळी मंदिरात असलेल्या कार्यक्रमासाठी गेला होता. पण रात्री 8 वाजले तरी घरी परतला नाही. वडील रेल्वे गोडावूनमध्ये हमाल म्हणून काम करतात. घरी परतल्यावर त्यांनी सर्व ठिकाणी मुलाचा शोध घेतला. मात्र यश काही मिळाला नाही. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून दीपक कोळी यांना कॉल आला. मुलगा सुखरूप पाहिजे असल्यास पाच लाख रुपये आणून द्या. पैसे घेऊन स्मशानभूमीत या, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी दीपक कोळी हे घराशेजारी असलेल्या स्मशानभूमीत धावतच गेले. मात्र त्यांना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या कॉलनंतर यशच्या घरच्यांनी ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाणे गाठले. मुलाचे अपहरण झाले असून, अपहरणकर्ता पाच लाख रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान अपहरण करणारा आरोपी हा कोळी यांच्याच घराजवळ राहणारा सागर गायकवाड असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
आरोपीने 'असे' केले मुलाचे अपहरण
सागर गायकवाड याने ओळखीचा फायदा घेऊन, यश याला जवळ बोलावले. त्यानंतर त्याला घेऊन तो एका स्मशानभूमीत गेला. त्याने तिथेच यशच्या वडिलांना खंडणी मागितली. त्यानंतर तो यशला घेऊन औरादमध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे घेऊन गेला. यशला तेथेच सोडून तो परत येत असताना, टोलनाक्यावर पोलिसानी त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीमध्ये त्याने मुलाच्या अपहरणाची कबुली दिली व मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. एका गरीब व हमाली करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचे अपहरण का केले असे विचारले असता, त्याने सांगितले की दीपक कोळी यांनी प्लॉट घेण्यासाठी रक्कम गोळा केली आहे. त्यांच्याकडे पैसे असल्याची माहिती मिळाली होती म्हणून अपहरण केल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा - महावितरणच्या गलथान कारभारमुळे दोन एकरातील ऊस जळून खाक
हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा