पंढरपूर - शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह प्रमुख बाजारपेठांमधील मोबाईल व्यावसायिकांनी चीनी वस्तूंच्या जाहिरातीचे फलक काढून फेकले. त्या जागी व्यावसायिकांनी मेड इन इंडियाचे फलक झळकावले आहेत. त्यामुळे आता पंढरपुरात मेड इन इंडियाची क्रेज दिसून येत आहे. त्यासाठी मनसेच्या वतीने सर्व व्यावसायिकांना निवेदन देण्यात आले होते.
लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनचा निषेध करुन कोंडी करण्यासाठी चीनी मालावर बहिष्कार टाकण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून पंढरपूर व्यापारी समिती व मोबाईल असोसिएशनच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंढरपूर शहरात चीनी मोबाईल विक्री व दुरुस्ती न करणे, तसेच शहरातील प्रत्येक दुकानवरील चीनी कंपनीचे फलक काढून तिथे मेड इन इंडियाची फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंढरीतील लहान मोठ्या मोबाईल व्यापाऱ्यांनी जुने चीनी कंपनीचे फलक काढून त्याठिकाणी मेड इन इंडियाचे फलक लावले. व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत पंढरपूरकरांनीही केले. यामुळे चीनी मोबाईलची मागणी कमी केली आहे. नागरिकही मेड इन इंडिया असणाऱ्या मोबाईलची मागणी करत आहेत.
मनसेने केला व्यावसायिकांचा सत्कार
मनसेच्या वतीने मोबाईल दुकानदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनविसे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे, पंढरपूर शहराध्यक्ष प्रताप भोसले, पंढरपूर उपाध्यक्ष अवधुत गडकरी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थिनी सेना शहराध्यक्ष पुजा माळी आणि शहर उपाध्यक्ष ईशा गायकवाड उपस्थित होते.