पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावातील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जंगलगी परिसरापासून एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.
एक किलोमीटर परिसर संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित -
मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीमध्ये कोंबड्यांचा बर्ड फ्लू सदृश्य आजारामुळे नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. आज त्या कोंबड्यांच्या तपासणीचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला. त्या कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लू मुळे झाला आहे. आत्तापर्यंत 309 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. जंगलगीपासून एक किलोमीटर क्षेत्रातील पक्षी, पक्षीखाद्य, अंडी, कोंबडी खत, पोल्टी अनुषंगिक साहित्यदेखील शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय जंगलगी गावापासून एक किलोमीटर क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कोंबड्यांच्या जत्रा व प्रदर्शनाला प्रतिबंध -
मंगळवेढा तालुक्यात कोंबड्यांची वाहतूक, विक्री, बाजार, जत्रा, प्रदर्शनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. जंगलगी, जंगलगी वस्ती, सलगर बु., सलगर खु., आसबेवाडी, लवंगी, बावची, चिक्कलगी, शिवणगी ही सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून पोल्ट्री फार्म हाऊसची तपासणी -
मंगळवेढा तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबड्यांची नियमित तपासणी करावी. कोंबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला त्याची माहिती द्यावी, कुकुट पालकांनी मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच परिसरातील कुक्कुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी देऊन पक्षांची संख्या, पक्षांमधील मृत्यूची संख्या यांची माहिती घ्यावी, याबाबतचा सात दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
हेही वाचा - जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास