मुंबई : कुर्ला बर्वे मार्ग इथं 9 डिसेंबरला बेस्ट उपक्रमातील एका बस चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला. तर, 40 हून अधिक जण जखमी झाले. त्या 9 मृतांपैकी 3 मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमातर्फे बेस्ट महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे. बेस्टकडून केवळ तीन मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता उर्वरित नातेवाईकांना कधी मदत मिळणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. दुसरीकडं बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळेही कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
अडीच महिन्यांनी बेस्टकडून आर्थिक मदत : अपघात 9 डिसेंबर रोजी झालेला असताना अडीच महिन्यांनी बेस्ट उपक्रमाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना थोडफार आर्थिक दिलासा मिळाला आहे. मात्र मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची, त्यांच्या वारसदारांची रितसर कायदेशीर माहिती बेस्टच्या विधी खात्यानं घेतली. त्याची खातरजमा केल्यानंतरच सदर आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळेच सदर मदत देण्यास थोडा उशीर झाला, असं बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
बेस्टच्या धडकेत 9 पादचारी ठार : कुर्ला इथं 9 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील एका बसच्या चालकानं 40 वाहनांना आणि पादचाऱ्यांना जोरात धडक दिली. या भीषण दुर्घटनेत 49 जण जखमी झाले. त्यापैकी 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील जखमींवर पालिकेच्या विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले.
फक्त तीन कुटुंबीयांना दिली मदत : आता अपघातात मृत झालेल्या 9 व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येणार आहे. यात 1) आफरीन अब्दुल सलीम शाह वय 19 वर्ष, 2) निजाम अन्सारी वय 49 वर्ष, 3) मेहताब शेख वय 22 वर्षे या तीन मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मंगळवारी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे अधिकारी श्रीनिवास यांच्या हस्ते प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
हेही वाचा :