सिंधुदुर्ग - नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. सध्या दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली, असं जर तुम्हाला कोणी म्हटले तर जरा विश्वास ठेवणे कठीणच. शिवाय, 'तुम्ही मला कधीही फोन करा' असे राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे नारायण राणे सांगतात. हे देखील ऐकायला कसं वाटेल. मात्र हे खर आहे. तर हे नारायण राणे तुम्हाला अभिप्रेत असलेले अर्थात केंद्रीय मंत्री नारायण राणे नाहीत. तर ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे.
उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे विकास कामाचा निधी मिळावा यासाठी सावंतवाडीतील नारायण राणे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. याचवेळी बोलताना उदय सामंत यांनी नारायण राणे भेटीला आल्याची माहिती दिली आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण, लगेचच त्यांनी हे नारायण राणे शिवसेनेचे सावंतवाडीतील माजी पंचायत समिती सदस्य असून आपल्या भेटीसाठी आल्याच म्हटले.
उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. त्या वेळी बोलताना त्यांनी आपला राष्ट्रवादीतून शिवसेनेने झालेला राजकीय प्रवास सांगितला. मुख्य गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन देखील त्यांनी अभिमानाने दाखवले. मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. ज्यावेळी आमची भेट झाली तेव्हा तुम्ही मला कधीही फोन करा. मी तुमचा फोन घेणार. फक्त सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय, असे सांगा. कारण त्या नारायण राणे यांचा फोन मी घेत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी सांगितले.
हेही वाचा - Illegal schools Maharashtra : अबब...! राज्यात ६७४ शाळा अनधिकृत; सर्वाधिक मुंबईत