सिंधुदुर्ग - जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात राहणारे परशुराम गंगावणे वयाच्या 12 व्या वर्षापासून चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांचे खेळ सादर करतात. त्या काळी कळसूत्री बाहुल्या नाचवत अनेक लोककथा सांगितल्या जायच्या. वडिलोपार्जित चालत आलेली ही कला जपणाऱ्या गंगावणेंना नुकताच 'चित्रकथी' या लोककला प्रकारासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा हा प्रवास अनेक संघर्षमय प्रसंगांनी भरलेला आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी विवेक ताम्हणकर यांनी घेतलेला हा आढावा.
गंगावणे यांनी जपली कळसूत्री बाहुल्यांची कला -
ज्या काळात मनोरंजनाची साधनेच नव्हती, तेव्हापासून चालत आलेली कळसूत्री बाहुल्यांची ही पारंपरिक कला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात गंगावणे यांनी जपली आहे. परशुराम गंगावणे आणि त्यांचे कुटुंबीय कळसूत्री बाहुल्यांची ही हजारो वर्षापूर्वीची कला आजही जपत आहेत. या मंडळींकडे लिखित प्राचीन दस्तावेज नाहीत. मात्र पिढ्यानपिढ्या सांगत आलेल्या कथांमुळे या समाजातील प्रत्येकाच्या ओठांवर ठाकरी शैलीतील रामायण, महाभारत ऐकायला मिळते, कळसूत्री बाहुल्यांच्या साथीने ते या अनेक लोककथांचे सादरीकरण करतात.
गोठ्यातील जनावरे विकून बनवले छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम
जन्मापासून वडील विश्राम, आजोबा आत्माराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदिवासी कलेचा वारसा पुढे चालू राहावा, यासाठी झटणाऱ्या परशुराम गंगावणेंनी गुरांसाठी बांधकाम केलेल्या गोठ्यातील गुरे विकून त्या गोठ्याचे छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम बनविल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यांनी 'विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट' नावाने नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे.
कलांगण आहे कलेच्या मांडणीच आंगण-
म्युझियमच्या आजूबाजूच्या माड, पोफळींच्या झाडांच्या खोडावरसुद्धा राजे महाराजे, द्वारपाल, स्वागत करणाऱ्या पुरातन स्त्रियांची चित्रे विविध रंगात रंगविलेली आहेत. आंगणात प्रवेश करायचे प्रवेशद्वार, कमानसुद्धा बांबूच्या डहाळ्यांपासून तयार करून त्यावर हरण, फुलांसारखी चित्रं तर प्रवेशद्वाराच्या एका बाजूस हातात ढोलकी तर सोबतीला नंदीबैल असे सिमेंट प्लास्टरपासून बनवलेली प्रतिकृती, त्यासमोरील छोट्याशा झोपडीत घरगडी, त्याची शेतात राबणारी कारभारीण पाहायला मिळते.
राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिशी झाली-
परशुराम विश्राम गंगावणे हे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलांचे जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहेत. कठीण परिस्थितीत त्यांनी ही लोककला जपून ठेवली आहे. ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. हे म्युझियम त्यांनी गुरांच्या गोठ्यामध्ये सुरू केले. शिवाजी महाराजांचे राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम परशुराम गंगावणे यांनी केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गच्या ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बेल, डोना वाद्य, गोंधळ, पोतराज अशा लोककलेची मांडणी केली आहे. गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती , स्वच्छ भारत अभियान, एड्स अवेरनेस अशा अनेक विषयांवर कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ इथे अनुभवता येतो-
कळसूत्री बाहुल्याचा खेळ कपड्यांच्या मखरामध्ये दोन फूट मोकळ्या भागात केला जातो. तोच कळसूत्री बाहुल्यांचा रंगमंच. या रंगमंचाचे पडद्याने दोन भाग केले जातात. मागे सूत्रधार उभा राहतो. सूत्रधार बाहुल्यांचे दोर आपल्या बोटात अडकवून नाचवतो आणि कथाही सांगतो. दोन हातांनी चार बाहुल्या नाचवत असताना बोटांचे कसब आणि कथा ऐकण्याची मजा काही वेगळीच असते.
छत्रपती शिवाजी राजांची मेहेरनजर पडली आणि या कलेला राजाश्रय लाभला
ऐतिहासिक काळात ठाकर आदिवासी लोक कठपुतळी, पपेट, चित्रकथीसारख्या मनोरंजनातून प्रबोधनात्मक कार्य करत जवळ जवळ ११ कलांचे सादरीकरण करत. इतिहास काळात असेच मनोरंजनाचे कार्यक्रम करताना चित्रकथी, पपेटवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांची मेहेरनजर पडली आणि या कलेला खरी ऊर्जितावस्था मिळून राजाश्रय लाभला, अशी माहिती परशुराम गंगावणे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कठपुतळी, कळसूत्री, बाहुल्यांचे सादरीकरण करण्यासाठी काही ठराविक मंदिरात जागा उपलब्ध करून दिली आणि रोजी-रोटीचा प्रश्नही सोडविला. त्याकाळी हातावर मोजण्याइतका आदिवासी ठाकर समाज होता. त्यामुळे प्रत्येकाला कुडाळ येथील केळबाई, साळगाव येथील वेताळ, झारापमधील भावई मंदिर अशी बरीच मंदिरे ठाकरांना आपली कला सादर करण्यासाठी दिली गेली. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत 14 व्या अध्यायात जो ‘वल्ली’ हा शब्द आहे तो ठाकर समाजाशी निगडित आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव सोडल्यास महाराष्ट्रात ‘वल्ली’ कुठेही नाही. यावरून ही कला ज्ञानेश्वरांच्या कार्यकाळात अस्तित्वात होती, याचे पुरावे मिळतात. असेही ते म्हणाले.
कलेच्या सादरीकरणासाठी फिरताना गंगावणे यांना 3 वेळा झाला अपघात-
गंगावणे यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. या कलेच्या सादरीकरणासाठी फिरत असताना त्यांचा तीन वेळा अपघात झाला आहे. एका अपघातात त्यांचा भाऊ गेला. तर एका अपघातात त्यांचा एक पाय कायमचा जायबंदी झाला आहे. राजाश्रय संपला मात्र ही कला सोडली नाही. वेळ पडल्यास मी मजुरी केली, झुणका भाकर केंद्र चालवलं, मासे विकले असल्याचेही परशुराम गंगावणे सांगतात.
आम्ही ही कला सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न करतोय
परशुराम गंगावणे यांचा मुलगा चेतन गंगावणे सांगतो, आम्ही ही कला सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न करतोय. डिजिटल माध्यमांचा वापर करून या कलेला आम्ही नवं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. कोरोना काळात कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारीसाठी जनजागृती करणारा संदेश दिला असल्याचेही चेतन म्हणाले.
कलेसाठी यांनी खूप कष्ट घेतले-
या कलेसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. अनेक दिवस ते बाहेर असायचे त्या काळात मी मुलांना सांभाळायचे. संसारात अनेक तडजोडी मला कराव्या लागल्या. कलेचा व्यासंग जोपासताना त्यांचे अनेकवेळा अपघात झाले. मात्र पुरस्काराने त्यांच्या मेहनतीचे चीज झाले, असल्याची भावना पद्मश्री परशुराम गंगावणे त्यांच्या पत्नी कविता गंगावणे यांनी व्यक्त केली.