सिंधुदुर्ग - संचारबंदी, लॉकडाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कलिंगड शेती हातची वाया गेली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक शेतात तसेच पडून राहिल्याने लाखो रुपयांना जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकेनासे झाले आहेत.
शेतकरी बांधवांना नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे कलिंगड मोठ्या प्रमाणावर आले आहे. नेमके विक्री करण्याच्या वेळीच देशावर संकट कोसळले. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशच ठप्प झाला. देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापार ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीलाही कलिंगडे कोणी घेण्यास तयार नाहीत. उठावच नसल्याने हे पीक शेतात तसेच पडून राहिले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर जनवरांना कलिंगड खाऊ घालण्याची वेळ आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 250 ते 300 शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवड केली आहे. केवळ 2 महिन्याच्या कालावधीत हे पीक घेतेले जाते. माञ, आता ग्राहक मिळत नाही, व उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे कलिंगडला फटका बसत आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वगळून 3 ते 4 लाख रुपये 3 एकरवर कलिंगडची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे ऐन हंगामच वाया गेला असल्याने येथील शेतकरी संकटात सापडला आहे.
सोने तारण ठेऊन किंवा बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायाचे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे संचारबंदी लागू असल्यामुळे वाहतूकीसाठी वाहन आणि विक्रीसाठी ग्राहक मिळत नसल्यामुळे शासनाने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.