सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निगर्स चक्रीवादळाने नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा आढावा आज(रविवार) व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी सादर केला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्री वादळामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरू असून कोणीही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही यांची खबरदारी घेण्यात येत आहे. राज्य शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची अस्मिता असलेला सिंधुदुर्ग किल्ला याच्याही संवर्धनाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी जास्तीचा निधीही शासनाकडून उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यांना नेहमी जास्तीच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. यामध्ये विषेशत: विजेची खांब पडतात, तारा तुटल्या जातात. यावर उपाय योजना म्हणून किनारपट्टी भागामध्ये विजपुरवठा करणाऱ्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. यासाठी खासदार निधीमधूनही पैसे उपलब्ध होणार आहेत. तसेच जिह्यामध्ये शासकीय यंत्रणेमध्ये मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी चक्राकार पध्दतीने शासनकडून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.