सातारा - वर्षभरापूर्वीच्या भांडणातूनच समर्थ मंदिरजवळ तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या १२ तासात चार हल्लेखोरांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. आकाश नितीन बल्लाळ (वय २०), अमन इस्माईल सय्यद (२०), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय 24), आकाश उदयसिंह शिंदे (२४, सर्व रा. समर्थ मंदिर, बोगदा परिसर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले कि, बजरंग लक्ष्मण गावडे (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
घर सोडावे लागल्याचा राग
एक वर्षांपूर्वी आकाश बल्लाळ याच्या घरासमोर खरकटे टाकण्यात आले होते. यावरून बजरंग गावडे आणि आकाश बल्लाळ यांच्यात मारामारी झाली होती. यावेळी गावडे याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या भांडणामुळे आकाश बल्लाळला तो राहत असलेले भाड्याचे घर सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले होते. असा समज झाल्याने आकाश बल्लाळ गावडेवर चिडून होता.
मित्रांच्या मदतीने साधला डाव
मंगळवार रात्री साडेदहाच्या सुमारास गावडे हा बोगद्या परिसरातील रस्त्याने घराकडे जात होता. यावेळी आकाश बल्लाळ, अमन सय्यद, तुषार धोत्रे, आकाश शिंदे यांनी बजरंग गावडे याच्यावर कोयता आणि तलवारीने जोरदार हल्ला चढवला. बजरंग गावडे यांच्या चेहऱ्यावर मानेवर खोलवर घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर संशयित हल्लेखोर तेथून पसार झाले. रात्री बोगदा परिसरात खून झाल्याची माहिती नागरिकांना समजल्यानंतर एकच खळबळ उडाली.
१२ तासात छडा
शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने घटनास्थळावरुन माहिती घेऊन हल्लेखोरांचा छडा लावला. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या सहका-यांनी गुन्ह्याचा तपास केला.
हेही वाचा - गमेवाडी गावात बिबट्याचा बछडा शेतात मृतावस्थेत आढळला
हेही वाचा - कराड-विटा मार्गावर एसटीच्या इंजिनला आग... तर, सुर्ली घाटात एसटी उलटली