सांगली - गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा देशात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा दुर्मिळ योग आला आहे. मात्र, येथील एका गर्भवती महिलेने ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धेला फाटा दिला आहे. समृद्धी चंदन जाधव असे या महिलेचे नाव आहे. त्या इस्लामपूर येथील महात्मा फुले कॉलनीत राहतात.
समृद्धी यांनी या ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून धाडसी कृती करत तरुणीने वेगळा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला.
समृद्धी चंदन जाधव यांची प्रतिक्रिया -
आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे व माझ्या कुटुंबाची जागृत केले. आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली. सासूबाई सिंधुताई जाधव, चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला. विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला करायला नको का? असा प्रश्न ही यावेळी समृद्धीने केला.
इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल -
अंनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे. ग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलेवर आणि गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण झालेली असते. गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, 'खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो. सूर्यग्रहणाबाबत आजचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडणाऱ्या युवतीचे कौतुक करावे इतके थोडे आहे.' अंनिस नेहमीच कृतिशील पाऊल टाकत असते. ग्रहणाबाबत हे प्रबोधन लोकांच्यात मोठी जनजागृती करेल, असे प्राध्यापक शामराव पाटील म्हणाले.
यावेळी प्राध्यापक डॉ. नितीन शिंदे यांनी इस्लामपुरातून सूर्यग्रहणाबाबत प्रबोधन केले. आपल्याकडे ग्रहण खंडग्रास पद्धतीने दिसते, आदी ग्रहणाबाबत करीत प्रबोधन करत शास्त्रीय माहिती दिली. या प्रबोधनाचे फेसबुकवरून थेट प्रसारण करण्यात आले होते. प्राध्यापक पी. एस. पाटील, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, तृप्ती थोरात यांनी संयोजन केले. तर प्राध्यापक डॉ. अर्जुन पन्हाळे, अरविंद कांबळे, प्राध्यापक राजा माळगी, विनोद मोहिते, पोनि नारायण देशमुख, संपत शिंदे आदी. उपस्थित होते.