सांगली - सांगली जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दणका बसला आहे. मंत्री पाटील यांचे मेहुणे असणाऱ्या मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. भाजप गटाने याठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे.
मत्र्यांची सासुरवाडीत लक्षवेधी लढत
सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सगळ्यात लक्षवेधी निवडणूक ठरली होती, ती मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीची. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सासुरवाडी आहे. त्या ठिकाणी त्यांचे मेहुणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर गटाविरुद्ध राष्ट्रवादीचे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी मंत्री जयंत पाटील यांची मेहुणी असणाऱ्या मनोरमादेवी शिंदे या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. या निवडणुकीमध्ये पुन्हा मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये सरपंच मनोरमादेवी शिंदे यांची मुलगी, दिर व अन्य कुटुंबातील सदस्य मैदानात होते. राष्ट्रवादी गटाच्या पॅनलच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा पार पडली.
राष्ट्रवादीचा धुरळा, भाजपचा झेंडा
मात्र, या निवडणुकीत मंत्री जयंत पाटील यांच्या मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. त्यामध्ये 17 पैकी 15 जागांवर भाजप गटाच्या दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला केवळ दोनच जागा या निवडणुकीत मिळाले आहेत. विद्यमान सरपंच सहा शिंदे-म्हैसाळकर कुटुंबातील सर्वच म्हणजे 6 जणांचा पराभव झाला आहे.
कुटुंबातील सर्वच उमेदवारांचा पराभव
ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, गेल्या दहा वर्षांत या ग्रामपंचायतीमध्ये केलेला भ्रष्टाचार आणि सरपंचांनी केलेली दहशत यंदा जनतेने मोडून काढली आहे. तसेच या निवडणुकीत मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या कुटुंबातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा उमेदवार रिंगणात होते आणि या सहाही उमेदवारांचा जनतेने पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.