रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीनंतर सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. राज्यात उदयाला आलेल्या नव्या राजकीय समिकरणांमुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य धूसर असल्याचे दिसत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा घेवून कोकणात आले त्यावेळी शांत झालेला नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला होता. अधिसूचना रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दाखवत, प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर नाणार रिफायनरी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हेही वाचा - मुख्यमंत्री शिवसेनेचाच, आठवडाभरात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते - अनंत गीते
यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाबाबत आग्रही असणारा भाजप विधानसभा निवडणुकीनंतर हा मुद्दा आणखी रेटून धरणार अशी शक्यता होती. मात्र, निवडणूकीच्या निकालानंतर सर्वच चित्र पालटले. सध्या भाजप विरोधात बसणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिघेही रिफायनरीच्या विरोधात आहेत. शिवसेने तर हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे भाजपने अनुकूलता दाखवलेल्या या प्रकल्पाचे भवितव्य अंधातरी दिसत आहे.