रत्नागिरी - जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरवर्षी पेक्षा आठवडाभर उशीरा पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाने पावसानंतर आता शेतीच्या कामांना गती दिली आहे. पेरणीची जवळपास80 टक्के कामं पूर्ण झाली असून शेतीच्या उकळीच्या कामांनाही वेग आला आहे.
कोकणात भात हे मुख्य पीक घेतले जाते. कोकणातले अनेक शेतकरी मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरवात करत असतात. तर काही शेतकरी दमदार पाऊस पडल्यानंतरच पेरणीला सुरवात करतात. त्यामुळे मान्सूनच्या दमदार आगमनाकडे बळीराजाचे लक्ष लागलेले आहे.
मान्सून उशिरा सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र कोकणात गेल्या पाच ते सहा दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस नियमित हजेरी लावत आहे. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला आहे.
6-7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर शेतीच्या मशागतीच्या कामांना नव्या जोमाने प्रारंभ झाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीमध्ये पोषक असा ओलावा तयार झाला आहे. त्यामुळे भातबियाण्यांच्या पेरणीच्या कामांनाही सुरुमार्कस वात झाली आहे.
रोहिणी, मृग नक्षत्रांच्या मुहूर्तावर पेरणीची कामे करण्यावर शेतकरी भर देतात. या पेरण्या वेळेत झाल्या की पुढील शेतीची नांगरणी, लावणी या कामामध्ये खोळंबा निर्माण होत नाही. मान्सूनपुर्व पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजाची लगबग वाढली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यापुढे पावसाने वाट पहायला न लावता अशीच साथ द्यावी, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.