रत्नागिरी - जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 फुट उंच उभारण्यात आलेला ध्वज हा रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे वक्तव्य पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या 100 फुट उंच ध्वजाचे आज वायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू, कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यात तुफान गर्दी
यावेळी वायकर म्हणाले, गेली 5 वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्य करताना नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले. अनेक विविध प्रसंगामध्ये या जिल्ह्यातील नागरिकांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिले. निर्सगाचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा विकास सदैव होत राहील, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा ध्वज उभारण्याच्या कामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. डी.के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी यांनी हा ध्वज उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
हेही वाचा - रत्नागिरीत वरूण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींना निरोप
यावेळी डी.के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवी, कॉन्ट्रॅक्टर युवराज बोंद्रे, गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थीनी झांज पथक व लेझीम नृत्य सादर केले.
कार्यक्रमाला माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, तटरक्षक दल, पोलीस दल पत्रकार, एनसीसीचे विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तटरक्षक दलाचे दांडेकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सुखटणकर उपस्थित होते.