रत्नागिरी - राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते आज (शुक्रवार) खेडमधील कोरेगाव येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आले असताना बोलत होते.
भाजपचे सुडाचे राजकारण सुरू आहे -
2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले, तेव्हापासून भाजपचा सुडाच्या राजकारणाचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची कृती, ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला संपवण्याचीच आहे, आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत. अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील, किंवा भाजपच्या कार्यकारिणी मिटिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने चौकशी करावी अशा पद्धतीचा ठराव होतो. भुजबळ साहेबांनी नुसते मत प्रदर्शित केले तर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जपून बोला याचा अर्थ केंद्रातील सत्तेचा दुरूपयोग हा मराठी माणसाला संपवण्यासाठी भाजप करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
याचाच परिपाक म्हणजे या रेड आहेत -
राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे, आणि त्याचाच परिपाक म्हणजेच अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्या घरावर सातत्याने होणाऱ्या रेड आहेत. असे ते म्हणाले. याचा मी जाहीर निषेध करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी फक्त टीका करावी -
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र, आणि तोच प्रकार आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने घडतोय, त्यांनी फक्त टीका करावी, आरोप करावेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळिमा फासण्याचे काम करावे एवढेच त्यांचे काम सुरू आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरूच; गुरुवारी ५४० नवे रुग्ण, २० जणांचा मृत्यू