रत्नागिरी - शहरामध्ये एका रात्रीत २१ श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विषप्रयोग करून या श्वानांना मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी प्राणीमित्राने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शहरात 21 श्वानांचा मृत्यू झाल्याने प्राणीमित्र संतप्त आहेत. सनिल उदय डोंगरे (वय २३, रा. गोडाऊन स्टॉप, नाचणे ) या प्राणीमित्राने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कुणीतरी अज्ञाताने श्वानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये कोणतेतरी विष टाकून ते श्वानांना खाण्यास दिले. त्यामुळे २१ श्वानांचा मृत्यू झाल्याचे डोंगरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचसोबत आणखी सुमारे ३० श्वान बेपत्ता असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली आहे.
हेही वाचा-भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट- नवाब मलिक
रासायनिक परिक्षणानंतर नेमके कारण स्पष्ट होणार-
पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत श्वानांचे शवविच्छेदन करण्यात आले. खाण्यामध्ये विषप्रयोग झाल्यामुळे श्वानांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रासायनिक परिक्षणानंतर नेमके कोणते विष घातले ते स्पष्ट होईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
अज्ञातावर गुन्हा दाखल
प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम १९६० चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषप्रयोग करून श्वानांना ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा-जशास तसे उत्तरानंतर ब्रिटन वठणीवर! कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीयांना क्वारांटाईनच्या नियमातून सूट