रायगड- रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस व पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी राजीनामा दिला आहे. वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आपण भाजपला रामराम करत असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
हेही वाचा- ढासळलेल्या रुग्णव्यवस्थेला बळकट करण्याची गरज - शरद पवार
आपण जेएसडब्ल्यू व रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात आंदोलन सुरू केले होते. या बैठकीला तत्कालीन पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आपल्याला न बोलवता परस्पर बैठक घेतली, असे पाटील म्हणाले. या वरिष्ठ नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. बैठकीत या नेत्यांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले. तसेच, आपण भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी या नेत्यांनी विविध आश्वासने दिले. परंतु, त्यातील एकही पूर्ण केले नाही. उलट आंदोलन होऊ नये असेच प्रयत्न केले. भाजपचा खरा चेहरा वेगळा आहे, या कारणाने पक्षाला रामराम करत असल्याचे त्यांनी सांगितले.